Mumbai : ‘खंडोबा’ला देखील सोसावा लागला ‘ निसर्ग’चा तडाखा
Khandoba also had to bear the brunt of nisarga
एमपीसीन्यूज : छोट्या पडद्यावर ‘जय मल्हार’ मधील ‘खंडोबा’ रंगवणारा कलाकार म्हणजे देवदत्त नागे. तो मूळचा अलिबागचा. देवदत्त कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाला आहे. पण त्याचं राहतं घर आजही अलिबागमध्येच आहे. चित्रीकरण नसेल किंवा सलग सुट्टी आली की तो थेट अलिबाग गाठतो.
तिथे त्याची वाडी आहे. त्यात आंब्याची आणि इतर खूप जुनी झाडं आहेत. आणि या झाडांनी वेढलेल्या हिरव्या कुशीत देवदत्तचं घर आहे. हे घरंही विलोभनीय आहे. मोठाल्या खिडक्या. वाऱ्याला आतबाहेर करण्यासाठी आमंत्रण देत असतात.
संपूर्णत: निसर्गाच्या कुशीत विसावलेलं देवदत्त नागेचं घर निसर्गाचा तडाखा बसण्यापूर्वी अत्यंत प्रसन्न होतं.
पण न भूतो न भविष्यति असे सध्या घडत आहे. त्यातच कधीही मोठ्या वादळांचा सामना करावा न लागलेल्या कोकणाला ‘निसर्ग’ या चक्रीवादळाचा तडाखा बसला.
या चक्रीवादळाचा मुख्य फटका रायगड जिल्ह्याला बसला. अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, रोहा, पेण आणि त्यांच्या आजूबाजूची गावे भुईसपाट झाली.
रविवारी या वादळाबद्दल बोलताना देवदत्त म्हणाला, ‘वादळ येऊन गेल्यानंतर आमच्या परिसरातले लाईट गेले. आत्ता तब्बल तीन दिवसांनंतर लाईट आले आहेत.
या काळात मोबाईलला रेंजही नव्हती. नंतर आली पण, बॅटरी संपत आली होती. मग आधी लॅपटॉपला फोन लावून, नंतर उरल्या सुरल्या बॅटरीज वापरुन फोन चार्ज करत होतो.
शेवटी घरासमोरच्या गाड्या सुरू करुन आम्ही फोन चार्ज केला. फोन चार्ज झाला तरी रेंज नव्हती. इथे दुसऱ्या दिवसापासून युद्धपातळीवर काम सुरू झालं. म्हणून तीन दिवसांनी लाईट आली.’
देवदत्तशी फोनवर बोलतानाही रेंज जात होती. फोन कट होत होता. पण तशातही पुन्हा पुन्हा फोन करून एकमेकांना माहिती देण्याचं काम चालू होतं. ‘सुरूवातीला आम्हाला वाटलं वारं येईल.
वादळाची शक्यता होती. त्यामुळे वारं वाढणार याची कल्पना होती. नंतर त्याचा वेग कमालीचा वाढला. झाडं हलू लागली. पानांची फडफड तर धडकी भरवणारी होती. वाऱ्याचा वेग वाढला. तसा पाऊसही.
आधी आम्ही ताडपत्री किंवा मिळेल त्याचा आधार घेऊन झाडं वाचवायचा प्रयत्न करू लागलो. पण पाऊस वाढला. वाऱ्याचा वेग तर इतका वाढला की एका पॉईंटनंतर आम्ही सगळे घरी आत सुन्न बसलो’.
‘आता होईल ते होईल हे उमजून चुकलं. नजरेसमोर झाडं तुटली. ती उन्मळून पडली तर पुन्हा लावता येतात. पण अनेक मोठी झाडं तुटली. मधून तुटली. इतकी जुनी वाढलेली मोठी झाडं. या वादळाने तोडली. हे बघत राहण्यापलीकडे पर्याय नव्हता.
शेवटी आम्ही गप्प सगळे घरात आलो. लाईट तर नव्हतेच. शेजारच्या झाडाची मोठी फांदी तुटली आणि अगदी शेजारच्या झाडावर पडली. खरंतर ही स्वामी कृपाच म्हणायची. नाहीतर आमच्या घराचंही मोठं नुकसान झालं असतं.’
वाऱ्याचा वेग प्रचंड होताच. झाडं पडत होती. तुटत होती. घराच्या गच्चीवरचे पत्रे उडाले, टाकी तुटली. असं बरंच काही झालंय, देवदत्तच्या घराचं. पण त्याला सल आहे ती झाडं तुटल्याची. तो म्हणतो, ‘टाकी, पत्रे हे आणखी काही दिवसांनी आणता येतील. ते लावता येईल.
पण इतकी मोठी, वर्षानुवर्षं असणारी झाडं तुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं उद्ध्वस्त झालं होतं. आंब्यांचा खच पडला होता झाडावरुन. इतकं वाईट वाटलं. हे आंबे लोकांच्या पोटात गेले असते तर फार बरं वाटलं असतं.
पण हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं होतं. ही अवस्था आमच्या परिसरातल्या प्रत्येक घराची अवस्था आहे. आता यातून पुन्हा सावरायचं आहे.’
देवदत्त आणि परिसरातल्या घरांमध्ये एक दूधवाले काका रोज दूध द्यायला येतात. वादळ गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आले. त्यांचे डोळे खूप सुजले होते.
देवदत्तने त्यांना विचारलं की कशाने सुजलेत डोळे? तर ते म्हणाले, वादळ इतकं भयानक होतं. इतकं नुकसान डोळ्यासमोर झालेलं पाहायचं म्हणजे रडण्याशिवाय काय पर्याय असतो आपल्याकडे. या भागातल्या प्रत्येकाचीच मनोवस्था थोड्याफार फरकाने अशीच आहे.