Mumbai: राज्यात कोरोनाबाधितांनी ओलांडला पाच हजारचा तर कोरोना बळींच्या संख्येने 250 चा टप्पा
एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आज पाच हजारांचा टप्पा ओलांडला. आज दिवसभरात राज्यात 552 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5 हजार 218 वर पोहोचला आहे तर मृतांचा एकूण आकडा 251 झाला आहे. आतापर्यंत एकूण 722 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज एकूण 150 रुग्ण बरे होऊन घरी गेले, हीच काय ती दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
एकूण 19 मृत्यूपैकी 12 जण मुंबईतील आहेत. पुण्यातील तीन , पिंपरी आणि सांगलीतील एक आणि ठाण्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या 19 मृत्यूंपैकी 12 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले. कोरोनामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या 251 झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या वतीने देण्यात आली आहे.
एकट्या मुंबईत आज 419 कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 83 हजार 111 नमुन्यांपैकी 77 हजार 638 नमुने निगेटीव्ह आले आहेत.