Mumbai : रेशनकार्ड नसलेल्यानाही सवलतीच्या दरात रेशन उपलब्ध करून द्या; छगन भुजबळ यांची केंद्र सरकारकडे मागणी

एमपीसी न्यूज – लाॅकडाऊनमुळे अनेक जण विविध जिल्ह्यांत अडकले आहेत. या नागरिकांकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना अन्नधान्य देण्याची कुठलीही योजना कार्यरत नाही. त्यामुळे या नागरिकांना सवलतीच्या दरात रेशन उपलब्ध करून द्या, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

छगन भुजबळ यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रेशनकार्डधारकांना अन्नधान्याचे वाटप झाल्यानंतर 5 टक्के धान्याची बचत झाली आहे. त्यामुळे हे धान्य राज्याच्या विविध जिल्ह्यांत अडकलेल्या मात्र, रेशनकार्ड नसलेल्या स्थलांतरित कामगार, मजूर, बेघर, गरीब व गरजूंना सवलतीच्या दरात वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी. हा धान्याचा पुरवठा एप्रिल मे आणि जून या महिन्यासाठी करावा, असे या पत्रात म्हटले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने राज्यातील एकही नागरिक उपाशी राहणार नाही. यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. मात्र, रेशन कार्ड नसलेल्या स्थलांतरितांना 2 रुपये किलो गहू व 3 रुपये किलो तांदूळ याप्रमाणे वितरण केल्यास त्यांना दिलासा मिळू शकेल, असे मत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.