Mumbai News: कृषी पुरस्कारांनी 198 शेतकऱ्यांचा होणार सन्मान
एमपीसी न्यूज – राज्यातील कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. 2 मे रोजी नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन 2017, 18, 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
याबाबतची माहिती देताना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कृषि विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते, तो कार्यक्रम आता 2 मे रोजी होणार आहे. कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 2 मे रोजी सकाळी 11 वाजता तीन वर्षातील 198 पुरस्कारार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कारार्थींना रोख रकमेसोबत स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र व सपत्नीक/ पतीसह सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारप्राप्त शेतकरी साधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्हणून कृषि विभागातील विविध योजनांमध्ये कार्य करणार असल्याचेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.
कष्टातून आपल्या शेतीत प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या या गौरव सोहळ्याचे थेट प्रसारण https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या कृषि विभागाच्या युट्यूब चॅनेलवरुन होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.
198 पुरस्कारार्थ्यांचा ‘या’ पुरस्कारांनी होणार सन्मान*
● डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार – 4 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 75 हजार रुपये)
● वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार -28 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 50 हजार रुपये)
● जिजामाता कृषिभूषण पुरस्कार – 9 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 50 हजार रुपये)
● कृषिभूषण (सेंद्रिय शेती) – 23 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 50 हजार रुपये)
● वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार – 9 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 30 हजार रुपये)
● उद्यानपंडीत पुरस्कार – 25 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 25 हजार रुपये)
● वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार – सर्वसाधारण गट – 57 पुरस्कारार्थी, आदिवासी गट – 18 पुरस्कारार्थी (प्रत्येकी 11 हजार रुपये)
● राज्यस्तरीय पीकस्पर्धा- खरीप भात – 9 पुरस्कारार्थी, खरीप सोयाबीन 9 पुरस्कारार्थी – प्रत्येकी प्रथम क्रमांक – 10 हजार रुपये, व्दितीय क्रमांक- 7 हजार रुपये आणि तृतीय क्रमांक 5 हजार रुपये
● पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार – 7 पुरस्कारार्थी.