Mumbai news: सर्व पालिकांनी ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील पालिका आयुक्तांना महत्वपूर्ण सुचना

एमपीसी न्यूज –  तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबतही आगाऊ नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पालिका क्षेत्रात येणाऱ्या काही दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडली नाही पाहिजे अशा महत्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन कोविडसंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड तसेच विविध पालिका अधिकारी देखील उपस्थित होते. शहरांतील आगामी पावसाळी तयारी व संभाव्य आपत्तींशी मुकाबला करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील कोविडचा मुकाबला करतांना इतर रोगांच्या रुग्णांना सुद्धा वेळीच उपचार मिळणे अतिशय गरजेचे आहे. पावसाळ्यात हिवताप, कॉलरा, कावीळ, लॅपटो, डेंग्यू तसेच इतर साथीचे आजारही पसरतात, कोविडवर उपचार करतांना या नॉन कोविड रुग्णांसाठी सुद्धा कोविडपासून वेगळी स्वतंत्र व्यवस्था असावी.

सौम्य लक्षणांच्या घरीच विलगीकरणातल्या रुग्णांना नेमके कधी रुग्णालयांत हलवावे, जेणे करून वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील. त्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ व निवृत्त डॉक्टर्सकडे रुग्णांच्या संपर्काची जबाबदारी द्यावी.

पहिल्या लाटेमध्ये विशेषत: ज्येष्ठ आणि वयस्कर नागरिकांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळला तर या दुसऱ्या लाटेत ३० ते ५० वयोगटात प्रमाण जास्त दिसते. एवढेच नाही तर लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसतोय. येणाऱ्या संभाव्य लाटेत हे प्रमाण आणखी वाढले तर आपली पूर्ण व्यवस्था हवी त्याचे नियोजन करून ठेवा व रुग्णालयांतील लहान मुलांचे उपचार कक्ष सुसज्ज ठेवा.

सध्या बऱ्याच पालिका क्षेत्रात रुग्ण संख्या स्थिरावलेली दिसते. धोका टळलेला नाही पण येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ऑक्सिजनच्याबाबतीत प्रत्येक पालिका आत्मनिर्भर झालीच पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतर कुणावरही अवलंबून राहता कामा नये, औषधांचा साठा, व्हेंटीलेटर्स पुरेशा संख्येने आहेत याची खात्री करून घ्यावी असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, भिवंडी निझामपूर, पनवेल, नवी मुंबई , वसई विरार पालिका आयुक्तांनी त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांनी देखील आपापल्या भागातील रुग्ण संख्या स्थिरावत आहे. तरी, रुग्णांना गंभीर अवस्थेत जाण्यापासून रोखण्याचे आव्हान कायम असून विविध सुविधा, औषधे या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती दिली.

यावेळी टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशी यांनी सौम्य व लक्षणविरहित रुग्णांची प्रकृती अचानक ढासळत जाणे, रुग्णालयात उशिरा दाखल करणे यामुळे मृत्यू दर वाढल्याचे सांगून रेमडीसीव्हीर , स्टीरॉइडसचा वापर, प्लाझ्माची नेमकी उपयुक्तता, विशेषत: रात्रीच्या वेळी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने यावेळी रुग्णालयात रुग्णांच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील यावेळी महत्वपूर्ण सूचना केल्या. जम्बो केंद्र किंवा फिल्ड हॉस्पिटल्स, शासकीय व खासगी रुग्णालयांचे अग्नि सुरक्षा, बांधकाम, विद्युत उपकरणाचे सुरक्षा काळजीपूर्वक तपासून घ्या असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.