Mumbai News : आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणी प्रशिक्षण, 18 जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

एमपीसी न्यूज – आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, पॉझिटिव्हिटी दर जास्त असलेल्या 18 जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करून कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणाची सुविधा निर्माण करण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आणि म्युकरमायकोसीस आजाराबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर माध्यमांना माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे बोलत होते.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील कोरोनाची साथ रोखतानाच आता आशा स्वयंसेविकांना रॅपीड ॲण्टीजेन चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सुमारे 70 हजाराच्या आसपास आशा स्वयंसेविका आहेत.

राज्याच्या सरासरी एवढ्या पॉझीटिव्हीटी दरापेक्षा 18 जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे तेथे होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) बंद करून कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणाची सुविधा निर्माण करण्याची सूचना देण्यात आली आहे. 15 व्या वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी 25 टक्के निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसीसचे 2245 रुग्ण आहेत. या आजारावर उपचारासाठी ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन वापरले जात असून त्याची किंमत जास्त आहे. केंद्र शासनाकडून या इंजेक्शन वाटपाचे नियंत्रण केले जात आहे. मात्र महाराष्ट्रात हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली असून त्यामाध्यमातून जूनच्या पहिल्या आठवड्यात 60 हजार व्हायल्स उपलब्ध होतील.

म्युकरमायकोसीस या आजाराला महाराष्ट्र शासनाने नोटीफाईबल डिसीस म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंद घेतली जाणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्यासाठी राज्यभरात 131 रुग्णालये नोटफाईड करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या राज्यात सुमारे 2200 रुग्णांपैकी 1007 रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.