Mumbai News : यंदाही दंहीहंडीला परवानगी नाही, आरोग्याला प्राधान्य
एमपीसी न्यूज – दहीहंडी साजरी केल्याने मोठ्या प्रमाणावर करोनाचा प्रभाव वाढू शकतो असे टास्क फोर्सने सांगितले आसल्याने यंदाही दंहीहंडीला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षी दहीहंडी उत्सवावर बंदी घातली होती. यंदा छोट्या प्रमाणात का असेना उत्सवाला परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली. तसेच सर्व गोविंदांना लशीचे दोन डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल, असे या बैठकीमध्ये समन्वय समितीने सरकारला सांगितले.
गणेशोत्सवाप्रमाणे नियम आखण्याची मागणीही समितीने केली. पण, बैठकीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी का देऊ शकत नाही, हे समन्वय समितीच्या सदस्यांना सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गोविंदा पथकांशी ई-संवाद साधला.जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सणवार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू, असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा-मुख्यमंत्र्यांचे आवाहन pic.twitter.com/TksrU41JbM
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 23, 2021
एकदा परवानगी दिली आणि प्रभाव वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल. यावेळी तुमची इच्छा असली तरी सरसकट परवानगी देता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आम्ही गोविंदा पथकांवर लक्ष कसे ठेवणार. यंत्रणांवरील ताण वैगेरे पाहता मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आवाहन केले आहे.
दरम्यान, सरकारने दहिहंडीला परवानगी नाकारल्यानंतर विविध स्तरातून सरकारवर टीका केली जात आहे.