Mumbai News : पंधरा दिवसानंतर परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याबाबत निर्णय – शिक्षण मंत्री
एमपीसी न्यूज – ‘गणेशोत्सवात अनेकजण एकत्र आले आहेत, त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल,’ असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, ’15 जुलै पासून ग्रामीण भागात आणि 17 तारखेपासून शहरी भागात शाळा सुरु करण्याबाबत वाच्यता केली होती. पण, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालरोग तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक संस्था यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कडून काही मार्गदर्शक सूचना आल्या, हे सर्व मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी कृती दलाशी चर्चा करून निर्णय घ्यावा अशी सूचना त्यांनी केली आहे.’
‘तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काय परिस्थिती आहे, नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवात अनेकजण एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत परिस्थिती पाहूनच शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल,’ असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.