Mumbai News: भाजपवर राग नाही, केवळ फडणवीस यांच्यामुळे पक्षाला रामराम – एकनाथ खडसे

एमपीसी न्यूज – माझा भाजपवर राग नाही, आपण भाजपच्या कोणत्याही केंद्रीय नेत्यावर टीका केली नाही. मी फक्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत आहे,  असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंच्या भाजपमधील राजकीय भूकंपाची घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी आज सकाळी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

खडसे म्हणाले, “आज मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेले 40 वर्ष भाजपचं काम करत होतो. या 40 वर्षांत अनेक प्रसंग आले. भाजप खेड्यापाड्यात पोहोचलेली नव्हती. भाजप उपेक्षित होती, त्यावेळपासून आजतागायत भाजपचे काम प्रामाणिकपणे करत आलो.

भाजपने देखील या कालखंडात मला मोठ्या प्रमाणात राजकारणात अनेक पदेही दिली. ते मी नाकारु शकत नाही. भाजपबद्दल माझ्या मनात कोणताही राग नाही. मी भाजपच्या कोणत्याही केंद्रीय नेत्यावर किंवा पक्षावर टीका केली नाही,” याकडे खडसे यांनी लक्ष वेधले.

“मध्यंतरी मुख्यमंत्री होण्याबाबत म्हटलं, बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे त्यानंतरच्या काळात घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. माझ्या अनेक चौकशा झाल्या, भूखंड हडप करण्याचे आरोप झाले,” या शब्दांत खडसे यांनी नाराजीला वाट करून दिली.

“माझ्यावर खोट्या विनयभंगाचा खटला देखील दाखल करण्यात आला. दमानिया यांनी त्यांचा विनयभंग केल्याचा खोटा खटला दाखल केला. पोलीस त्यावेळी तयार नव्हते. दमानिया यांनी पोलीस स्टेशनला रात्रभर गोंधळ घातला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करायला सांगितला”, असा आरोप खडसे यांनी केला.

“वास्तविक अशा स्वरुपाचे खोटे गुन्हे नोंद करायला सांगणं चुकीचं आहे. या खटल्यातून मी नुकतंच 15 दिवसापूर्वी बाहेर आलो. छळ किती करावा याला काही मर्यादा राहिल्या नव्हत्या. तरीही इतके दिवस मी सहन करत आलो,” असे खडसे म्हणाले.

“ज्या कालखंडात माझ्यावर आरोप झाले तेव्हा कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नव्हती. माझ्या चौकशीनिमित्त माझा राजीनामा घेतला गेला”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“मी पक्षासाठी संपूर्ण आयुष्य घालवलं. ते मी त्या कालखंडात घालवलं जेव्हा दगडं, धोंडे खाल्ले, लोकं थुंकली, मारलं, वाळीत टाकलं गेलं, अशा कालखंडातून आम्ही काम केलं. पक्षासाठी 40 वर्षं आम्ही काम केलं. आजही माझी भाजपशी कोणतीही तक्रार नाही. माझी तक्रार मी वारंवार बोलून दाखवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भूखंडाची चौकशी लावसी. मी सगळ्यांमधून सुटलो. पण त्याचा प्रचंड मनस्ताप झाला,” अशा भावना खडसे यांनी व्यक्त केल्या.

“एखाद्या व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं, कोर्टामध्ये खटला चालणं, यापेक्षा मरणं आहे. खटला दाखल करण्यासाठी गोंधळ केला म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सांगणं. मी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, ती मुंबईत मी मुक्ताईनगर तेव्हा नाईलाजास्तव गुन्हा दाखल केला, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. नियमानुसार, कायद्यानुसार काम करा, असं त्यावेळेस सांगता आलं असतं. मला खूप बदनामी सहन करावी लागली,” असे खडसे म्हणाले.

“तरीही त्यानंतर मी 4 वर्ष काढलं. माझ्या कथित पीएवर त्यांनी 9 महिने पाळत ठेवली. तु्म्ही आमच्यावर पाळत ठेवत होते. आयुष्यात मला काय मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही. पण मनस्ताप झाला याचं जास्त दु:ख आहे. मी जे काही पद मिळवलं ते माझ्या ताकदीवर झालं.” असे एकनाथ खडसे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.