Mumbai News : कडक लॉकडाऊनची आवश्यकता नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज – गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रावर दुष्टचक्र आहे. गेले काही दिवस लॉकडाऊनसदृश्य बंधने टाकली आहेत. सध्या गरज असली तरी, कडक लॉकडाऊन करण्याची गरज वाटत नाही. कारण सगळे वागताना समजुतदारपणा दाखवत आहेत. त्यामुळे 9 ते 10 लाख सक्रिय रुग्णांची शक्यता आपण 6 लाखांपर्यंत मर्यादेत ठेवली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ( शुक्रवारी) दिली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘कोरोना चाचण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. 12 कोटी डोस घेण्याची राज्याची तयारी आहे. मे महिन्यात 18 लाख डोस मिळणार आहे. परंतु लशींचं उत्पादन मर्यादित स्वरुपात होत आहे त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. जून ते जुलैमध्ये लशींचा साठा सुरळीत होईल, असेही ते म्हणाले.

18 ते 44 वयोगटातील 6 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी डोस आपल्याला आवश्यक आहे. हे सर्व 12 कोटी डोस एक रकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. मी केंद्राला पुन्हा विनंती करतो की आमची पूर्ण तयारी आहे. कृपया आपण यात लक्ष घालून आम्हाला जास्तीत जास्त लसीचा साठा उपलब्ध करून दिला तर महाराष्ट्र लवकरात लवकर या कोविडच्या संकटावर मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

राज्यातील आरोग्य सुविधा वाढवत आहोत. गेल्या वर्षी राज्यात 2 प्रयोगशाळा होत्या. राज्यात आतापर्यंत 609 प्रयोगशाळा वाढवल्या आहेत. सध्या राज्यात 5500 कोविड सेंटर उभारले आहेत. 11 हजार 713 वेंटिलेटर आपल्या राज्यात असून 28,937 आयसीयू बेड्स आहेत.

सध्या रुग्णांना वेळेत ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. रेमडेसिवीरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्याला दररोज 50 हजार रेमडेसिवीरची गरज आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास अडचण होऊ शकते असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.