Mumbai News : ‘आज दिवसभर मीही अन्नत्याग करणार’ – शरद पवार

एमपीसी न्यूज – कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेल्या आठ खासदारांनी अन्नत्याग केला आहे. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी राज्यसभेच्या उपसभापतींसह केंद्र सरकारच्या कृषी धोरणावरही प्रश्न उपस्थित केले.

राज्यसभा सदस्यांना निलंबित करुन त्यांचे अधिकार काढले. सगळ्या सदस्यांनी आत्मक्लेष करण्यासाठी काल संध्याकाळपासून उपोषण केलं. आपल्या मनातील भावना त्यांनी सभागृहाबाहेर व्यक्त केल्या.

आश्चर्याची बाब म्हणजे उपासभापतींनी नियमांना महत्त्व न देता, सदस्यांचे अधिकार नाकारले आणि उपोषण करणाऱ्या सदस्यांना चहा देण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरंच झालं. आज सदस्यांनी अन्नत्याग केला. मीही आज दिवसभर अन्नत्याग करणार आहे. त्यांच्या अभियानात मी सहभागी होणार आहे, असं शरद पवार म्हणाले.

राज्यसभेत यापूर्वी जे घडलं नाही ते पाहायला मिळालं. राज्यसभेत कृषी विषयक विधेयकं येणार होती. या विधेयकांवर दोन-तीन दिवस चर्चा होणे अपेक्षित असते. ही विधेयकं तातडीने मंजूर करावी, अशी सत्ताधारी पक्षाची भूमिका होती. या विधेयकांबाबत सदस्यांना प्रश्न होते, चर्चा करण्याचा आग्रह होता. परंतु हा आग्रह बाजूला ठेवून सभागृहाचे काम पुढे रेटून नेण्याचं दिसत होतं.

हे नियमाविरुद्ध असल्याचं खासदार सतत सभापतींना सांगत होते. प्रतिसाद न मिळाल्यामुळे सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली. यावेळी नियमांचं पुस्तक फाडण्याचा प्रकार झाला. मात्र उपासभातींनीही ऐकून घ्यायला हवं होतं. पण ते न करता आवाजी पद्धतीने मतदान घेतलं. आवाजी मतदानाने विधेयकं मंजूर झाली. त्यामुळे सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती.

माझी अपेक्षा अशी आहे की, उपासभापतींनी सदस्यांना मत मांडायची संधी द्यायला हवी होती. मी महाराष्ट्रात आणि संसदेत काम केलं आहे पण पीठासीन अधिकाऱ्यांकडून असं वर्तन पाहिलं नव्हतं. माननीय उपासभापती हे बिहारमधील ज्येष्ठ नेते आहेत, परंतु विचारांना तिलांजली देण्याचं काम सभागृहात झालं. उपसभापतींची भूमिका सभागृहाच्या प्रतिष्ठेचं अवमूल्यन करणारी आहे. त्यांचं वर्तन सदनात कसं होतं ते सगळ्यांनी पाहिलं. बिहारच्या लोकांना पण चिंता वाटेल त्याच्या वर्तनाबाबत, अशा शब्दांत शरद पवारांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर टीका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.