Mumbai News: शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासून सुरू करावे, आदित्य ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

राज्यात आणि देशात परीक्षांचा मुद्दा गाजत आहे. त्यापार्श्वभूमीवर याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आदित्य ठाकरे यांनी पत्र पाठविले आहे.

एमपीसी न्यूज – शैक्षणिक वर्ष जून-जुलै 2020 ऐवजी जानेवारी 2021 पासून सुरू करावे. यामुळे कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. विविध शाखांच्या परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणात पंतप्रधानांनी स्वत: हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

राज्यात आणि देशात परीक्षांचा मुद्दा गाजत आहे. त्यापार्श्वभूमीवर याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आदित्य ठाकरे यांनी पत्र पाठविले आहे.

त्यात आदित्य म्हणतात, आपल्या नेतृत्वाखाली देश कोरोनाविरूद्ध लढा देत आहे. यात नागरिकही मोठ्या प्रामाणिकपणे आपले योगदान देत आहेत. विद्यार्थ्यांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने देशातील बहुतांश जण घरूनच काम करत आहेत. अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठ, व्यावसायिक व अव्यासायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याचे ठरवत आहेत.

पण, जगभरात जिथे कुठे शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली, तिथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

हा विषय केवळ विद्यार्थ्यांशी संबंधित नाही. तर त्यांच्या कुटुंबीय आणि शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचाही आहे.

त्यामुळे या विषयात हस्तक्षेप करून सर्व शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावे. यात आपण स्वत: हस्तक्षेप करावा, अशी विनंती मंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.