Mumbai News : राजकीय नेत्यांना बदनाम करण्यासाठीच अशा छाप्यांचा वापर – जयंत पाटील

सीबीआय छापासत्राचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

एमपीसीन्यूज : न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय छापासत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा छाप्यांचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप करतानाच या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली.

उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या परवानगीचा उपयोग सीबीआय छापासत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.