Mumbai : कोरोनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पंतप्रधान मोदी जबाबदार : पृथ्वीराज चव्हाण
Prime Minister Modi responsible if law and order situation arises due to corona: Prithviraj Chavan
एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असतील, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
कोरोनाच्या संकटामुळे जगभरात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अमेरिका, ब्रिटन या प्रमुख देशांनी त्यांच्या बेरोजगार व पगारात कपात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. अशाच प्रकारे मोदी यांनीही मदत करावी, असेही ते म्हणाले.
देशाचा आर्थिक विकास दर कोरोना येण्यापूर्वी कमी होता. आता तो आणखी खाली गेला आहे. केंद्र सरकार देशाची आर्थिक परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. या परिस्थितीला नरेंद्र मोदी हेच जबाबदार असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
कोरोना विषाणूमुळे जगभरातील बाजारपेठ ठप्प झाली आहे. कोरोनामुळे प्रत्येक देश कित्येक वर्षे मागे गेले आहेत. हीच परिस्थिती आपल्या देशाचीही होणार आहे.
विकासदर पूर्वीसारखाच राहणार असल्याचे मोदी कोणत्या आधारे सांगत आहेत, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी केंद्र शासनातर्फे प्रयत्न करण्यात यावे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.