Mumbai: आर. आर. आबांचे जनतेच्या मनातलं स्थान अढळ; उपमुख्यमंत्र्यांकडून आठवणींना उजाळा
एमपीसी न्यूज – माजी उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय आर. आर. आबांना आपल्यातून जावून पाच वर्षे झाली असली तरी त्यांच्या आठवणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या मनात आजही ताज्या आहेत. स्वर्गीय आबांनी राबवलेलं ग्रामस्वच्छता, तंटामुक्ती अभियान, त्यांचा डान्सबारबंदीचा निर्णय, पोलिसभरती भ्रष्टाचारमुक्त करुन हजारो युवकांना दिलेली संधी, यामुळे राज्यातील जनतेच्या मनातलं त्यांचं स्थान अढळ आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. आबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करुन आदरांजली वाहिली.
सर्वसामान्य जनतेचे लाडके आबा म्हणजेच स्व. आर. आर. पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! तळागाळातुन वर आलेल्या आबांना सामाजिक प्रश्नांची जाण होती. त्यांच्यासारखा निर्विवाद कणखर नेतृत्व, कुशल प्रशासक व अभ्यासू नेता महाराष्ट्राला लाभणं हे भाग्यच! त्यांचं कार्य कायम स्मरणात राहील. pic.twitter.com/h2jmZyaD1v
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 16, 2020
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आर. आर. आबांच्या आठवणींना उजाळा देतांना म्हणाले की, आर. आर. आबा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते होते. आम्हा सर्वांचे मित्र, सहकारी होते. अत्यंत गरीब कुटुंबातून येऊनही गुणवत्ता, कठोर परिश्रम, पक्षनिष्ठेच्या बळावर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचता येतं, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं होतं.
जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी न्याय दिला. प्रत्येक पदावर स्वत:च्या कामाचा ठसा उमटवला. आर. आर. आबांचं जीवन हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आर. आर. आबांना आदरांजली वाहिली.