Mumbai: राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक; त्याच विचारांवर राज्याची वाटचाल- अजित पवार
Mumbai: Rajarshi Shahu Maharaj's thoughts on social justice are always a guide; maharashtra's journey on the same thoughts says dcm ajit pawar अनिष्ट प्रथा, वाईट रुढी, चुकीच्या परंपरांवर बंदी घातली. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत, आपल्या राज्यात त्यासंबंधीचा कायदा केला.
एमपीसी न्यूज- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक असून त्याच विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहिली.
उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वारसा समर्थपणे पुढे नेला.
उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पुरोगामी, क्रांतिकारक विचार दिला. बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृहे सुरु केली. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी धरणे बांधली.
सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! तसंच राज्यातील जनतेला 'सामाजिक न्याय दिना'च्या शुभेच्छा! छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक असून याच विचारांवर आपल्या राज्याची वाटचाल सुरू आहे. pic.twitter.com/6YmiMeQpUw
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 26, 2020
बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक विचार त्यांनीच खऱ्या अर्थानं पुढे नेला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली, त्यांना प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा निर्मुलन, अस्पृश्यता निवारणाचे काम केले.
अनिष्ट प्रथा, वाईट रुढी, चुकीच्या परंपरांवर बंदी घातली. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत, आपल्या राज्यात त्यासंबंधीचा कायदा केला. सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी, प्रगत, दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे नेहमीच आपल्यासाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले आहे.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक, ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाल्याने उपमुख्यमंत्र्यांनी डॉ. तात्याराव लहाने यांचेही अभिनंदन केले आहे.