Mumbai : सर्वधर्मगुरूंनी ‘आरोग्यदूत’ बनून जनजागृती करावी – आरोग्यमंत्री टोपे

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहेत. या आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. राज्यातील सर्वधर्मगुरूंनी ‘आरोग्यदूत’ बनून जनजागृती करावी, असे आवाहन करत राज्यातील जनतेला गुढी पाडव्यानिमित्त नविन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’, असा संकल्प करण्याचेही आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज, मंगळवारी (दि. 24) केले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनता आणि माध्यम प्रतिनीधींशी संवाद साधला.

आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यात आतापर्यंत 107 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सुमारे 15 रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहेत, ही समाधानाची बाब आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन करूनही नागरिक घराबाहेर पडताहेत. ही गंभीर बाब आहे. राज्य शासनाच्या सूचनांचं पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या मुंबई, पुण्याहून मूळगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र, अशा लोकांना गावांत प्रवेश दिला जात नाहीये. त्यांच्याकडे संशयाने न पाहता आपल्या परिजनांना गावी येऊ द्या, त्यांना अडवू नका, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. बाधीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी आपुलकीने वागतानाच माणुसकी सोडू नका, असा सल्लाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

उद्या बुधवारी (दि. 25) असलेल्या गुढी पाडवा सणानिमित्त टोपे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच नववर्षाची सुरूवात कोरोनाला दूर सारण्याच्या दृढ निश्चयाने करा. या विषाणूवर विजय मिळविण्याचा संकल्प करा. स्वयंशीस्त पाळून घरी थांबा, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासणी (ओपीडी) बंद ठेवली आहे. वास्तविक संचारबंदीतून वैद्यकीय सेवा वगळण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नये, असे आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.