Mumbai : शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर; पुढील 3 महिने पाच रुपयात मिळणार थाळी

एमपीसी न्यूज – शिवभोजन योजनेचा विस्तार करत ती आता तालुका स्तरावर नेण्यात आली आहे. पुढील तीन महिने पाच रुपयांमध्ये शिवभोजन थाळी मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी (दि. 7) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर लोक यांचे जेवणाअभावी हाल होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या जिल्हा मुख्यालयी शिवभोजन केंद्रे चालविली जात आहेत. त्याचा विस्तार  करून आता तालुका स्तरावर ही योजना सुरु होणार आहे. पुढील तीन महिन्यासाठी शिवभोजनाच्या थाळीचा दर पाच रुपये इतका करण्यात आला आहे.

शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात 50 रुपये प्रती थाळी असून, ग्रामीण भागात 35 रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या 5 रुपये एवढ्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शहरी भागात प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागात प्रती थाळी 30 रुपये,  असे अनुदान संबंधित केंद्र चालकाला देण्यात येणार आहे.

या शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही भोजनालये सकाळी 11 ते दुपारी 3 या काळात सुरु राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.