Mumbai : राज्यात चार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू!; राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्ण संख्या 423

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यात चार करोना बाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. कोविडमुळे राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता वीस इतकी झाली आहे. तर, आज राज्यात 88 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यात एकूण रुग्ण संख्या 423 इतकी झाली आहे.

आज राज्यात 4 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या 4 रुग्णांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत –
१) ६१ वर्षे , पुरुष – हा रुग्ण दिनांक ३१ मार्च रोजी नायर रुग्णालयात भरती झाला. त्याला रक्ताचा कर्करोग होता. त्याचा काल दुपारी मृत्यू झाला.
२) ५८ वर्षे पुरुष – मूत्रपिंडाचा जुनाट आजार असणारा हा रुग्ण २९ तारखेला भरती झाला होता. त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. काल संध्याकाळी त्याचा सायन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
३) ५८ वर्षे पुरुष – हा रुग्ण २६ मार्च रोजी एका खाजगी रुग्णालयात भरती झाला. त्याचा काल दुपारी मृत्यू झाला.
४) ६२ वर्षे, पुरुष या रुग्णाचा मृत्यू कस्तुरबा रुणालयात आज संध्याकाळी झाला.

आज राज्यात ८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ५४ रुग्ण मुंबई येथील असून ९ जण अहमदनगरचे ,११ पुणे येथील आहेत. याशिवाय ९ जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. २ रुग्ण औरंगाबादचे तर प्रत्येकी १ रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४२३ झाली आहे.

राज्यात आज एकूण ६४८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १०८७३ नमुन्यांपैकी १०२८० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ४२३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४२ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानं तर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८,२४४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २१३८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त १०६२ व्यक्तींच्या यादीपैकी ८९० व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ५७६ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे.

आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ४ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पिपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनर्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी २९२ टीम काम करत आहेत तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात २७३ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये २१० टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत. अशा २३३२ टीम संपूर्ण राज्यात काम करत आहेत.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या अनुषंगाने राज्यातील ३० रुग्णालयांना कोविड १९ उपचाराबाबत आदेशित करण्याबाबतचे नोटिफिकेशनही नुकतेच काढण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.