Chinchwad News: महापालिका आणि आदित्य बिर्ला ग्रुपतर्फे जागतिक दर्जाचे गांधी शांती केंद्र उभारणार  

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिका आणि आदित्य बिर्ला ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने  सर्व्हे नं 26-30 फिनोलेक्स चौक येथे उभारण्यात येणारे गांधी शांती केंद्र हे जागतिक दर्जाचे असणार आहे. यामध्ये महात्मा गांधीजी यांचा संदेश जगभर पोहचवण्यासाठी आवश्यक दृकश्राव्य दालने, ग्रंथालय, सुसज्ज सभागृह उभारण्यात येणार आहे. या कामाचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि आदित्य बिर्ला ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व्हे नं 26-30 फिनोलेक्स चौक येथे उभारण्यात येणा-या गांधी शांती केंद्राचे भूमिपूजन महापौर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या भूमिपूजन सोहळ्यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मुंबई येथून ऑनलाईन पद्धतीने आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या  चेअरमन राजश्री बिर्ला आणि आदित्य बिर्ला ग्रुपचे विश्वस्त अश्विन कोठारी तसेच आदित्य बिर्ला ग्रुपच्या चीफ सीईओ रेखा दुबे, क्लिनिकल सर्व्हीसेसचे चीफ डॉ. एस.पी. सिंग, चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. राजशेखर अय्यर आदी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या जागेवर उभारण्यात येणारे गांधी शांती केंद्र हे जोहान्सबर्ग, न्यूयॉर्क, दिल्ली येथे उभ्या असलेल्या महात्मा गांधी स्मारकांच्या धर्तीवर आणि नविन अभिनव कल्पनांमधून उभे राहणार आहे. पिंपरी- चिंचवड महापालिका आणि आदित्य बिर्ला ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणारे गांधी शांती केंद्र हे जागतिक दर्जाचे असणार आहे. यामध्ये महात्मा गांधीजी यांचा संदेश जगभर पोहचवण्यासाठी आवश्यक दृकश्राव्य दालने, ग्रंथालय, सुसज्ज सभागृह उभारण्यात येणार आहे.

तसेच महात्मा गांधीजींनी संपूर्ण जगाला दिलेली अहिंसा आणि सत्याग्रह ही दोन शाश्वत मुल्ये आजही कशी प्रेरणादायक आहेत.  याची माहिती तसेच अहिंसा आणि सत्याग्रह या मूल्यांच्या आधारे जगभर उभा राहिलेल्या चळवळी यांचा रंजक इतिहास भावी पिढ्यांना कळावा यासाठी या शांती केंद्रामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महात्मा गांधीजींनी अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संपूर्ण जगाला प्रेरित केले. गांधीजी निर्भयता या तत्वाला आधारभूत मानत. सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीने निर्भय राहून शांततापूर्ण मार्गाने आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे आवश्यक आहे. महात्मा गांधींचे विचार, त्यांची जीवनमुल्ये व त्यांची शिकवण नव्या पिढीला कळण्यासाठी गांधी शांती केंद्राची मदत होईल, असे मत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.