Nashik News : सामाजिक संस्थेच्या साहाय्याने आदिवासी बहुल गावाची दुष्काळावर मात

गंगा आली रे अंगणी - सुरगाण्यातील म्हैसमाळकरांची तृष्णा नाशिकच्या सोशल नेटवर्किंग फोरमने भागवली

एमपीसी न्यूज – नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांना तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत असलेल्या म्हैसमाळ गावात नाशिकच्या सोशल नेटवर्किंग फोरमने पोहोचलेल्या पाण्याचे गावकऱ्यांनी वाजत गाजत स्वागत केले. गावातील महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन नाचत गात या पाण्याचे केलेले अनोखे स्वागत संपूर्ण परिसरात सुखद चर्चेचा विषय ठरले.

नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ हे गाव मागील वर्षी दुष्काळासाठी देशभरात चर्चेत आले होते. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या वाचून सोशल नेटवर्किंग फोरम (एसएनएफ) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या गावाचा पाणी प्रश्न सोडवण्याचे ठरवले. त्यानंतर गेली दीड वर्षे एसएनएफ टीमला अथक परिश्रमातून म्हैसमाळ गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यात यश आले आणि अखेर या प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न झाले.

यावेळी एसएनएफच्या “पाण्याच्या बदल्यात वृक्ष संवर्धन” या योनजेअंतर्गत गावात वृक्षारोपण करण्यात आले. या रोपांची निगा राखण ते वाढवण्याची गावकऱ्यांनीही आनंदाने जबाबदारी घेतली. यासोबतच गावात पाणी आल्याने गाव हागणदारीमुक्त करण्याचाही गावकऱ्यांनी केला. यावेळी बोलताना गावकऱ्यांनी सांगितले की, पाण्याच्या अभावामुळे आमच्या गावातील मुलांशी लग्न करायला मुली तयार नव्हत्या. गेल्या काही दिवसात सुटलेल्या पाणी प्रश्नामुळे आता तरुणांची लग्नेही होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या प्रकल्पासाठी पुढील दानशूर संस्थांचे सहकार्य लाभले.
एसएनएफ टीम –
तांत्रिक सहकार्य करूणा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई – पाईप्स
इनरव्हील क्लब ऑफ बॉंबे वेस्ट – सिमेंट
श्री. जे एल नरसिम्हन, हैदराबाद – वीजपंप
धूम कुटुंबीय – विहिरीसाठी मोफत जागा
म्हैसमाळ गावकरी – श्रमदान
ग्रामपंचायत रोंघाणे – पाण्याची टाकी

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिंतामण गुंबाडे, मोतीराम जोगारे, जनाबाई गुंबाडे, आंबु माले, निर्मलाबाई जाधव यांनी प्रयत्न केले. आदी उपस्थित होते. विजय भरसट यांनी सुत्रसंचलन तर डॉ. निलेश पाटील यांनी आभार मानले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश लोखंडे, भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. जयदिप निकम, सोशल नेटवर्कींग फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड, माजी जि.प. सदस्य गोपाळ धूम, प्रशांत बच्छाव, महेश टोपले, रामदास शिंदे, कवी देवदत्त चौधरी, संदिप बत्तासे, जयदिप गायकवाड, देविदास कामडी, मनोहर जाधव, दिलीप महाले, यशवंतराव धुम, संदिप डगळे आदी उपस्थित होते.

म्हैसमाळ पाणी प्रकल्पाची पार्श्वभूमी
सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ हे गाव देशभरात भीषण दुष्काळासाठी गाजलेले होते. गेल्या वर्षी सर्वच प्रसिद्धी माध्यमांनी या गावाची समस्या राष्ट्रीय पातळीवर मांडली होती. या गावच्या पाणी टंचाईची माहिती मिळाल्यावर एसएनएफने हा प्रश्न हाती घेतला. परिसराची पहाणी केल्यावर अडीच किलोमीटर अंतरावर वर्षभर पाणी असलेले धरण असल्याचे लक्षात आले. तिथे विहीर खोदून गावात पाणी आणणे शक्य होते. या धरणाच्या काठावर शेती असलेल्या धूम कुटुंबीयांनी एसएनएफ टीमने केलेल्या विनंतीला मान देत विहिरीसाठी मोफत जागा दिली.

या जागेवर गावकऱ्यांनी श्रमदानातून विहीर खोदली. तिला भरपूर पाणी लागल्यावर ग्रामपंचायतने गावात टाकी बांधली. मुंबईची करुणा ट्रस्ट, ईनरव्हील क्लब ऑफ मुंबई वेस्ट, जे एल नरसिम्हन यांनी पाईप्स, मोटार आणि इतर साहित्यासाठी मदत केली. गावकऱ्यांनी श्रमदानातून चर खोदले आणि पाईपलाईन पूर्णत्वास गेली. खरे म्हणजे मे महिन्यातच गावात पाणी आल्याने यावर्षी लोकांचे पाण्यासाठी हाल झाले नाहीत. तथापी कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचे लोकार्पण उशिरा करण्यात आले. अशा रीतीने फोरमच्या अथक परिश्रमातून ज्या गावात रात्री पहाटे विहिरीत उतरून हंडाभर पाण्यासाठी तासंतास तिष्ठत बसावे लागत होते तिथे लोकांच्या दारात पाणी पोहोचवण्याचा फोरमच्या टीमला आत्यंतिक समाधान आहे.

राज्यातील सर्वाधिक टंचाईग्रस्त गाव म्हणून म्हैसमाळची असलेली ओळख या जलाभियानामूळे पुसली गेली असून सोशल नेटवर्कींग फोरमने विविध माध्यमातून व मदतीतून हा आवाहनात्मक प्रकल्प पुर्णत्वास नेल्याने ग्रामस्थ व महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
– प्रमोद गायकवाड, अध्यक्ष, सोशल नेटवर्कींग फोरम

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.