Nashik News : साहित्य संमेलनातील बालकट्टामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचाही असेल सहभाग : आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे
एमपीसी न्यूज – 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे खास आकर्षण म्हणजे बालकट्टा असणार आहे. या उपक्रमासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळा आणि शासकीय वसतिगृहे येथील वय वर्ष 10 ते 15 या वयोगटातील इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना स्वरचित कथा किंवा कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सृजनतेला चालना मिळणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेल्या माहितीनुसार, शाळा स्तरावर बाललेखक आणि बालकवी यांच्या साहित्याची निवड होऊन ते संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे 6 मार्च 2021 पर्यंत सादर होतील. यानंतर प्रकल्प कार्यालयाकडून हे बालसाहित्य हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बालकट्टा समन्वय समितीकडे पाठवले जाणार आहे. या ठिकाणी निवड समितीने निवड केलेल्या कथा आणि कविता यांचे सादरीकरण विद्यार्थी संमेलनाच्या दिवशी करणार असल्याची माहितीही श्री. सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वांरे दिली आहे.
असे असतील नियम :
कविता/ कथा ही विद्यार्थ्यांची स्वरचितच असावी. त्याचे पुराव्या दाखल संबंधित मुख्याध्यापकांचे पत्र जोडणे अनिवार्य आहे.कथा/ कविता यांच्यासाठी विषयाची मर्यादा असणार नाही.कवितेसाठी 20 ओळींची तर कथेसाठी 200 ओळींची मर्यादा असणार आहे. लेखकाने/ कवीने स्वत:चे नाव व पत्ता, शाळेचे नाव, पालकांचा दूरध्वनी क्रमांक (मुख्याध्यापक किंवा वर्ग शिक्षक यांचा मोबाईल क्रमांक चालेल.) कागदाच्या वरील बाजूस स्पष्ट अक्षरात लिहिलेला असावा.
‘लेखन’ हे व्यक्त होण्याचे उत्तम साधन आहे. विद्यार्थी उत्तम निरीक्षण करतात. निरीक्षण आणि अनुभवातून समृद्ध होतात. विद्यार्थ्यांच्या सृजनतेला व्यासपीठमिळावे या हेतूने साहित्य संमेलनात बालकट्टा या उपक्रमाचा समावेश केला आहे. आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून उत्तमोत्तम साहित्य या निमित्ताने पुढे येईल.
आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, नाशिक