Azadi Ka Amrutmahotsav: पुण्यात “भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी वीरांचे योगदान” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र
एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (रा.अ.ज.आ.), नवी दिल्ली, देशभरातील 125 विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी वीरांच्या योगदानावर मंगळवारी (दि.27) कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून डेक्कन कॉलेज पोस्ट-ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (अभिमत विद्यापीठ),पुणे, यांनी रा.अ.ज.आ. यांच्या सहकार्याने डेक्कन कॉलेजमध्ये, मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 रोजी, “भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी वीरांचे योगदान” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते.
एनसीएसटी सल्लागार राघव मित्तल हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डेक्कन कॉलेजचे उपकुलगुरू माननीय प्रा. प्रसाद जोशी यांनी भूषविले. त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले.डॉ. निशा सावंत यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर विद्यापीठाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सेलचे संपर्क अधिकारी प्रा. पांडुरंग साबळे,डॉ. तृप्ती मोरे आदी उपस्थित होते. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व संग्रहालयात आयोजित केलेल्या आदिवासी स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान या विषयावरील छायाचित्र (पोस्टर) प्रदर्शनाचे अनावरण राघव मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले.
मित्तल यांनी अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या आरक्षण सुविधांविषयीच्या शंकांचे निरसन केले. रा.अ.ज.आ. द्वारे नेमलेले कार्यक्रम समन्वयक डॉ. वैभव खटावकर यांनी आयोगाच्या कार्यप्रणालीविषयी सर्वांना अवगत केले. याविषयीची चित्रफीतही या प्रसंगी प्रक्षेपीत करण्यात आली. प्रा. भास्कर खांडवी, नाशिक यांचे चर्चासत्राच्या विषयावर विशेष व्याख्यान झाले. ब्रिटीश राजवटीविरुद्ध उठाव करणार्या आदिवासी वीरांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र त्यांच्या संघर्षाला पुरेशी ओळख मिळाली नाही.