Navlakh Umbre News : राजकारणाला कंटाळून नवलाख उंब्रेचे ग्रामपंचायत सदस्य पंडित दहातोंडे यांचा राजीनामा

एमपीसीन्यूज : नवलाख उंब्रे ग्रामपंचायतीचे सदस्य पंडित दहातोंडे यांनी गावच्या राजकारणाला कंटाळून शुक्रवारी (दि.26) पोलीस बंदोबस्तात आपल्या ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा दिला.

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार 13 सदस्य असलेली ग्रामपंचायत नवलाख उंब्रे बिनविरोध झाली. सरपंचपदी चैताली कोयते व उपसरपंचपदी मयुर नरवडे यांची निवड करण्यात आली.

दुसऱ्याच दिवशी ग्रामपंचायत सदस्य पंडित दहातोंडे यांनी ग्रामसेविका प्रमिला घोडेकर यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा दिला. यावेळी तळेगाव एमआयडीसीचे पोलीस नाईक सचिन काचोळे उपस्थित होते.

राजीनामा देण्याबाबत पंडित दहातोंडे म्हणाले, तीन पंचवार्षिकमध्ये प्रभाग क्रमांक 4 मधून सदस्य म्हणून ग्रामस्थांनी निवडून दिले. मात्र, यावेळेस दिलेल्या शब्दाप्रमाणे उपसरपंचपद दिले नाही. तसेच ग्रामस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत मिळाली नाही.

केवळ गावात होत असलेल्या राजकारणाला कंटाळून मी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. पूर्वी जनतेतून सरपंच निवड होत होती तेच योग्य होते. आज सदस्यांमधून सरपंच निवडला जात असल्याने कार्यक्षम असलेल्या सदस्याला पद मिळत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.