NCP’s Rupali Chakankar warns Kangana : मुंबई कोणाच्या बापाची हे जरुर दाखवून देऊ, पण…

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणावरुन सुरु झालेले राजकारण आता प्रादेशिक अस्मितेच्या सीमा पार करु लागले आहे. कालच अभिनेत्री कंगना राणावत हिने आपण मुंबईत येणार असून आपल्याला रोखण्याचा कोणाच्या बापामध्ये हिंमत आहे असं महाराष्ट्राच्या नागरिकांना खुले आव्हान दिले आहे. तिला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे.

ट्विटवरुन कंगनावर निशाणा साधत रुपाली यांनी कंगनाला दिसणारी मुंबई ही मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे असं म्हटलं आहे. तसेच मुंबई कोणाच्या बापाची आहे हे आम्ही दाखवलं असतं मात्र कंगनासारख्या कृतघ्न लोकांसाठी आमच्याकडे वेळ नाही असा टोलाही रुपाली यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यानंतर कंगनाने आणखी कांगावा करत एक ट्विट केलं त्यात मुंबईत येऊ नकोस असं धमकावणाऱ्यांना थेट आव्हान दिलं आहे. ‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’, असं तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कंगनाच्या या आव्हानाला रुपाली यांनी उत्तर दिलं आहे. ‘मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण संस्कारहीन, कृतघ्न लोकांसाठी आम्ही वेळ वाया घालवत नाही. कंगना रणौत तू उतरलेल्या विमानतळापासून ते तुझ्या घरापर्यंत जी मुंबई पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे’, असा टोला रुपाली यांनी लगावला आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये रुपाली यांनी, ‘शुटींगच्या सेटपासून ते चित्रपटगृहांपर्यंत जी सुरक्षितता आहे ती मुंबई पोलिसांमुळेच आहे.सध्या काही काम नसल्यामुळे फुटकळ प्रसिद्धीसाठी अशी बालिश बडबड करताना स्वतःच्या तोंडाला लगाम घाल. मुंबई पोलीस देशाचा अभिमान आहेत’, असं म्हणत कंगनावर टीका केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.