New Delhi : ‘लॉकडाऊन’चे पालन करा; अन्यथा बचाव अशक्य : पंतप्रधान
एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ मधून देशवासीयांसोबत सवांद साधला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभरात लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनबद्दल त्यांनी देशवासीयांची माफी मागितली. त्याचवेळी नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही तर या आजारापासून बचाव करणे अशक्य होईल. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी लक्ष्मणरेषा पाळावीच लागेल, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी घेतलेल्या कठोर निर्णयाबद्दल देशवासीयांना होणाऱ्या त्रासाबद्दल आपल्याला जाणीव आहे. मात्र, 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात कठोर निर्णय घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळेच कठोर निर्णय घ्यावे लागले. कोरोनाविरुद्धचे युद्ध हे जीवनमरणाचे युद्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.