New Delhi : मोबाइल प्रीपेड रिचार्ज, पंखे, पुस्तकांची दुकानं सुरू ठेवण्यास हिरवा कंदिल

केंद्र सरकारचे सर्व राज्यांना पत्र

एमपीसी न्यूज : शहरी भागातील दूध डेअरी, ब्रेडचे कारखाने, पीठाच्या गिरण्या सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. याबरोबरच मोबाइल रिचार्ज करण्यासाठी रिचार्जची दुकानंही सुरू राहणार आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पंख्याची दुकानं सुरू ठेवण्यासह विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची दुकानेही सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली.

या संदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना २१ एप्रिलला पत्र पाठवले आहे. करोनामुळे सुरु केलेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारने आणखी काही व्यवहारांना सूट दिली आहे. जेष्ठांसाठी त्यांच्या बँकेतील खात्यांचे काम करणाऱ्या आणि देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सेवांना सरकारने सूट दिली आहे. त्याचबरोबर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवावी, असे पत्रही गृहमंत्रालयाने २२ एप्रिलला राज्यांना पाठवले आहे.

सरकारने शहरी भागातील अन्न प्रक्रिया उद्योग, यामध्ये दूध डेअरी, ब्रेडचे कारखाने (बेकरी), पीठाच्या गिरण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मोबाइल प्रीपेड रिचार्ज करण्यासाठी रिचार्जची दुकानंही सुरू राहणार आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पंख्याची दुकानं सुरू ठेवण्यासही सरकारने मुभा दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं आवश्यक असल्याने पुस्तकांची दुकानंही सुरू राहतील. फळांची आयात- निर्यात, कृषी आणि फळबाग उत्पादन करणाऱ्या संशोधन संस्थांना, मधमाशी पालन आणि त्यासंबंधीच्या व्यवहारांना सूट दिली असल्याचे गृहमंत्रालाने पत्रात म्हटले आहे.

लाखो भारतीय मर्चंट शिपिंग जहाजांवर काम करतात. पण लॉकडाऊनमुळे त्यांना जहाजांवर कामासाठी जाता येत नाही किंवा जहाजांवर अडकले आहेत. यामुळे आपली नोकरी जाण्याची भीती भारतीयांना आहे. याची केंद्र सरकारने दखल घेतली. जहाजांवर काम करणाऱ्या भारतीय कामगारांच्या साइन इन आणि साइन ऑफ संबंधी दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. २१ एप्रिलच्या पत्रात यासंबंधी विस्तृत माहिती दिली आह. आहे.

किरकोळ घटना वगळता देशात बहुतेक ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होत आहे आणि ते समाधानकारक आहे. ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीला वेग येत आहे. जे क्षेत्र हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमध्ये नाही तेथील उद्योग सुरळीत करण्याचे प्रयत्न राज्य सरकारांकडून सुरू आहेत.

अनेक ठिकाणी अन्न प्रक्रिया उद्योग, विशेष आर्थिक क्षेत्र आणि निर्यात केंद्रांच्या कामांना गती आली आहे. रस्ते बांधणी, सिमेंट उत्पादन आणि विट भट्ट्या सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी स्थलांतरित मजुरांना रोजगार मिळाला आहे. औद्योगिक कंपन्यांच्या समस्या दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या संदर्भात औद्योगिक कंपन्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. ज्या उद्योगांना परवानगी आहे ती कशा प्रकारे सुरू करावीत, यावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.