New Delhi: गुड न्यूज! देशातील तब्बल दहा हजार रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात
कोरोनाबाधितांची एकूण संख्या 37 हजार 776 तर कोरोना बळींचा आकडा 1,223 वर
एमपीसी न्यूज – आत्तापर्यंत 10 हजार 18 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुक्त रुग्णांची टक्केवारी 26.52 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, ही दिलासादायक बातमी आहे. देशभरात करोना रुग्णांची संख्या 37 हजार 776 इतकी झाली असून आत्तापर्यंत 1,223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना मृत्यूदर 3.24 टक्के इतका मर्यादित ठेवण्यात यश आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशभरात करोनाचं संकट संपलेलं नाही. रुग्णसंख्या रोज वाढते आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधीही 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.
बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, बाहेरून घरी आल्यावर हात स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसंच जिथे करोनाचा रुग्ण सापडतो तो भाग तातडीने सील करण्यात येतो. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करुन त्यांना अलगीकरण किंवा विलीगकरण करण्याचा सल्लाही दिला जातो आहे. सर्वतोपरी खबरदारी घेऊनही रुग्णसंख्या वाढते आहे. त्याचमुळे लॉकडाऊनचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. जगाच्या तुलनेत भारतातील कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणाखाली असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे. भारताने आतापर्यंत योग्य दिशेने पावले टाकून योग्य वेळी निर्णय घेतल्यामुळेच ते शक्य झाल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.