New Delhi : टाटा मोटर्सने जगभरातील ग्राहकांसाठी घेतला दिलासादायक निर्णय
एमपीसी न्यूज : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सने जगभरातील ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्सचे व्यावसायिक वाहन असलेल्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी लॉकडाउन दरम्यान संपणार आहे किंवा संपली आहे, अशा ग्राहकांना कंपनीने वाहनांच्या वॉरंटीमध्ये दोन महिन्यांची वाढ केल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
म्हणजे एखाद्या वाहनाची वॉरंटी 3 मेपर्यंत असले तर त्यांना दोन महिन्यांची अतिरिक्त सवलत देण्यात आली आहे. याशिवाय व्यावसायिक वाहन सेवा विस्तारीकरणाचा भाग म्हणून टाटा मोटर्सने भारतातील त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय लॉकडाउन कालावधीदरम्यान नियोजित असलेल्या पूर्वीच्या मोफत सर्विसेससाठी दोन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे.
वॉरंटी संपणा-या ग्राहकांसाठी वॉरंटी कालावधीमध्ये दोन महिन्यांची वाढ, लॉकडाउन कालावधीदरम्यान मुदत संपणा-यांसाठी टाटा सुरक्षा एएमसीमध्येही वाढ करण्यात आली आहे. टाटा मोटर्स सुरक्षामधील सर्व सक्रिय करारांसाठीही एक महिन्याची वैधता वाढ केल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
याशिवाय राष्ट्रीय लॉकडाउन कालावधीदरम्यान नियोजित एएमसी सेवा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना एक महिन्याची मुदत वाढ दिली आहे.
राष्ट्रीय लॉकडाउन कालावधीदरम्यान सरकारने दिलेल्या आदेशानुसार आवश्यक वस्तूंची ने-आण करणा-या ट्रक्ससाठी टाटा मोटर्स हेल्पलाइन, टाटा सपोर्ट क्रमांक – १८०० २०९ ७९७९ देखील सक्रियपणे सुरू केला आहे. टाटा मोटर्सने दिलेल्या या सवलतींमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.