Pune : साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनाकडे वळावे – नितीन गडकरी
एमपीसी न्यूज – साखर तयार केल्यानंतर वर्षभर गोदामात पडून राहते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. हे सर्व लक्षात घेता. साखर कारखानदारांनी आताच इथेनॉल उत्पादनाकडे वळण्याची गरज आहे. ते सर्वांच्या भल्याचे ठरणार असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
पुण्यात दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वतीने साखर परिषद 20-20 चे आयोजन करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाच्या समारोपला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार दिलीप वळसे पाटील, विद्याधर अनासकर तसेच साखर कारखानदार देखील उपस्थित होते.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, राज्यातील अनेक भागात मागील कित्येक वर्षापासून ऊस उत्पादक शेतकरी एफआरपीच्या प्रश्नावर आंदोलन करतात. शेतकर्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना योग्य भाव देण्याच्या दृष्टीने आताच इथेनॉलकडे साखर कारखानदारांनी वळावे. अन्यथा भविष्यात राज्यातील काही कारखाने कायमचे बंद होतील. हे टाळण्यासाठी लवकरात लवकर इथेनॉल निर्मितीकडे जावे. हे झाल्यास साखरेचे दर देखील कायम स्थिर राहतील. तसेच साखर उत्पादनापेक्षा इथेनॉल निर्मिती वर भर दिला पाहिजे. अन्यथा साखर उद्योग संकटात सापडेल. आता मी इथेनॉलपासून बायोप्लास्टिक तयार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.