Nigadi: दैनंदिन जीवनात ‘आयुर्वेदसह योगा’ला अनन्यसाधारण महत्व – डॉ. निनाद नाईक
एमपीसी न्यूज – आजच्या दैनंदिन जीवन पद्धतीचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत. त्यामुळे आरोग्यदायी जीवन जगण्याकरिता दैनंदिन जीवनात ‘आयुर्वेद आणि योगा’चे अनन्यसाधारण महत्व आहे, असे मत आयुर्वेदाचार्य डॉ. निनाद नाईक यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागातर्फे निगडी, यमुनानगर येथील रुग्णालयात आरोग्य वर्धिनी (हेल्थ अॅन्ड वेलनेस) या कार्यक्रमाचे सोमवारी (दि. 3) आयोजन केले होते. त्याअंतर्गत आयोजित केलेल्या ‘आयुर्वेद आणि योगा’ विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
- यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, प्रजापिता सोनाली दिदी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे, डॉ. विजया आंबेडकर, डॉ. रामनाथ बच्छाव, डॉ. धीरज तायडे, डॉ. स्मीता नागरगोजे, डॉ. सचिन शिनगारे, डॉ. मोनिका कांबळे आदी उपस्थित होते.
ब्रम्हकुमारी प्रजापिता सोनाली दिदी यांनी आजच्या धक्काधक्कीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये मानवाला शांततेची, समाधानाची आणि प्रेमाची गरज आहे. राजयोग मेडीटेशन (साधना) करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आजार झाल्यावर सतर्क राहण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठीच सतर्क राहणे गरजेचे असल्याचे डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.
- यावेळी रक्तदाब आणि रक्तातील साखर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 98 रुग्णांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. शैलजा भावसार यांनी केले. चंद्रशेखर सरवदे यांनी सूत्रसंचालन केले. तर, डॉ. संध्या भोईर यांनी आभार मानले. आशा गायकवाड, अमित सुतार यांनी संयोजनात पुढाकार घेतला.