Nigdi : वैभवशाली भारताच्या निर्मितीसाठी संस्कारक्षम मूल्यशिक्षणाची गरज – इंदुमती काटदरे
एमपीसी न्यूज – आपला भारत देश चारित्र्यसंपन्न, सक्षम व वैभवशाली बनवण्यासाठी तसेच आपल्या देशाला मिळालेला विश्व विद्यालयाचा दर्जा टिकविण्यासाठी आपली शिक्षण प्रणाली आणि कुटुंब व्यवस्था जपली पाहिजे, असे मत अहमदाबाद येथील पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती इंदुमती काटदरे यांनी व्यक्त केले.
निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी भास्कर रिकामे, निवेदिता कच्छवा, वामनराव अभ्यंकर, प्रकाश क्षीरसागर, पांडुरंग अनंत प्रभुजी, शैलजा सांगळे, डॉ. अजित जगताप यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
इंदुमती काटदरे म्हणाल्या, “संपूर्ण देशभर पुनरुत्थान विद्यापीठाच्या माध्यमातून समाजाच्या अमुलाग्र परिवर्तनासाठी साठ वर्षाची योजना आखण्यात आली आहे. बारा वर्षांच्या पाच तपाच्या योजनेअंतर्गत समाजातील विद्वतजनांचे ध्रुवीकरण, युगानुकुल प्रस्तुती, कुटुंब शिक्षण, शिशु शिक्षण, वानप्रस्थाश्रम, रमणीय वृद्धावस्था याचा आराखडा तयार करण्यात आला आहे”
पुढील दोन वर्षाच्या संशोधक, अध्यापक, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी यांच्यासाठी एक हजार ग्रंथ निर्मितीची योजना असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या कार्यामध्ये समाजहितैषी सुजाण, विद्यावन लोकांनी सहभागी व्हावे असे काटदरे यांनी आवाहन केले आहे.
शिल्पा बिबिकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माधुरी मापारी यांनी आभार मानले. विनीता श्रीखंडे यांनी परिचय करुन दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला विभाग सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.