Nigdi News : गणेश तलाव त्वरीत स्वच्छ करा – विठ्ठल प्रतिष्ठानची मागणी
एमपीसी न्यूज – गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यापार्श्वभूमीवर विसर्जन घाट असलेला प्राधिकरणातील गणेश तलाव स्वच्छ करावा, अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखील दळवी यांनी निवेदन दिले आहे.
निगडी प्राधिकरण, प्रभाग 15 मधील गणेश तलावात सध्या जलपर्णी आणि इतर रोपटी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच शेवाळ साठले असून याकडे पालिका दुर्लक्ष करत आहे. तोंडावर आलेल्या गणेशोत्सवात तलावातील अस्वच्छ पाण्यात गणेश विसर्जन कसे करायचे? असा सवाल दळवी यांनी निवेदनात उपस्थित केला आहे.
गणेश तलावात दरवर्षी शेकडो भाविक गणेश विसर्जन करतात. त्यामुळे नागरिकांच्या भावना आणि श्रद्धेचा विचार करून त्वरीत गणेश तलाव स्वच्छ करावा, अशी मागणी दळवी यांनी निवेदनात केली आहे.