Nigdi News: प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यालयाचे बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन

यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी पक्ष आणि कार्यकर्ता हा ज्या ठिकाणी शासन पोहोचत नाही अशा ठिकाणी पोहोचला पाहिजे. तसेच गरीब, शोषित, अन्यायग्रस्त अशा घटकांसाठी कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचे रान करण्याची तयारी ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.

एमपीसी न्यूज – प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते गुरुवारी (दि.9) निगडी प्राधिकरण येथे करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा कार्यकारिणी आणि अन्य तालुक्यांच्या नियुक्त्यांची औपचारिक घोषणा पक्षाकडून करण्यात आल्याची माहिती पक्षाचे संघटक नीरज कडू यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी पक्ष आणि कार्यकर्ता हा ज्या ठिकाणी शासन पोहोचत नाही अशा ठिकाणी पोहोचला पाहिजे. तसेच गरीब, शोषित, अन्यायग्रस्त अशा घटकांसाठी कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचे रान करण्याची तयारी ठेवावी असे आवाहन त्यांनी यावेळी नवनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या विस्ताराचा भाग म्हणून पक्षाने आता पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष दिले आहे. बच्चू कडू यांचे कार्य आणि त्यांची जनमानसात असलेली प्रतिमा याचा पक्ष विस्ताराला निश्चित फायदा होईल असा दावा नीरज कडू यांनी केला.

पुढील काळात जनसामान्यांना अडचणीच्या असलेल्या समस्यांना पक्ष वाचा फोडत राहील आणि सर्व प्रकारच्या पुढील काळातील निवडणुका लढविण्याची तयारी पक्ष कार्यकर्त्यांनी ठेवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला पक्षाचे प्रवक्ते अजय महाराज बारस्कर, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष नंदकिशोर जगदाळे, पुणे शहर अध्यक्ष सुनील गोरे, नगर जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, शेतकरी संघटना पदाधिकारी संतोष पवार, मंगेश फडके, हवेली तालुकाध्यक्ष महेश कनकोरे, दौंड तालुकाध्यक्ष रमेश शितोळे, तुकाराम रणदिवे, बाळासाहेब मराठे, अजिंक्य बारणे, प्रवीण खरात, रामभाऊ कुकडे, संदीप नवले, प्रज्वल जवळकर, नितेश गाडगे, चंद्रकांत उद्गिरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.