Pimpri : रिक्षा चालक मालकांना पाच लाखाचा आरोग्य विमा देण्याचे नितीन गडकरी यांचे आश्वासन
एमपीसी न्यूज – इलेक्ट्रॉनिक रिक्षांना केंद्र सरकारने परवानगी दिली असून या रिक्षांना परवान्याची आवश्यकता राहणार नाही, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. मात्र, हे परवाने वाटप करताना रिक्षा चालकांना विश्वासात घ्या, अशी मागणी रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाने गडकरी यांच्याकडे केली आहे. त्याबरोबर विविध मागण्यांचे निवेदन गडकरी यांना सादर केले. या शिष्टमंडळात दिल्ली रिक्षा टॅक्सी संघटनेचे नेते राजेंद्र सोनी, अचल सिंग, मधुकर थोरात, मारुती कोंडे, मोशवीर लोकरे, सुनील बोर्डे, विजय पाटील, श्रीरंग जाधव यांचा समावेश होता.
भारतात दोन कोटी पेक्षा अधिक रिक्षा चालक मालक आहेत, इलेक्ट्रॉनिक रिक्षा मुळे या रिक्षा व्यवसायांवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी सरकारने घ्यावी. रिक्षा इन्शुरन्सची दरवाढ रद्द करावी,ओला उबर या कंपन्यांना कायद्याच्या कक्षेत आणावे देशभरातील रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, रिक्षा चालक -मालकांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी आदी मागण्याचे निवेदन या वेळी देण्यात आले. रिक्षा चालकांना आजारपणात पाच लाख रुपयांची आरोग्य विमा लागू करण्यात येईल. याची लवकरच सरकारच्या वतीने घोषणा करण्यात येईल, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी या शिष्टमंडळास दिले.