Pimpri : पूर्वांचल हा भारताचा अविभाज्य भाग – विरागजी पाचपोर
एमपीसी न्यूज – भूतकाळापासून वर्तमानापर्यंत पूर्वांचल हा भारताचा अविभाज्य भाग असून, या भागातील नागरिकांची राष्ट्रभक्ती अखंडपणे राहील, असे मत मुस्लिम राष्ट्रीय मंच व ज्येष्ठ पत्रकार विरागजी पाचपोर यांनी आज चिंचवड येथे व्यक्त केले.
चिंचवड येथील चापेकर वाड्यात विश्व संचार केंद्र व क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने आज (दि. २६ मे) देवर्षि नारद यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते पूर्वांचलातील स्थित्यंतर याविषयावर बोलत होते. यावेळी क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभुणे, कार्यवाहक विलास लांडगे, विस्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी मिलींद कांबळे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, पूर्वांचलातील फुटिरतावादी आतंकवादी, हे आपलेच आहेत. ते परकीय आहेत, देशद्रोही आहेत म्हणून त्यांची हेटाळणी करणे चुकीचे आहे. त्यांना आपलेच समजले पाहिजे. आपलेपणाची भावना जोपासत त्यांना आपलेसे केले पाहिजे. पूर्वांचल विकास विभाग गत ५० वर्षांपासून हेच करीत आहे. त्यामुळे पूर्वांचलात अखंडता टिकून आहे. पूर्वांचलाचे लचके तोडण्याची हिंमत कोणी करू नये किंवा हा भाग भारतापासून वेगळा होईल याही भ्रमात कोणी वावरु नये. पूर्वांचलाला भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये ख्रिश्चनांकडून केले जाणारे धर्मांतरण व त्यातून निर्माण होणारा फुटीरतावाद, बांगला देशी मुस्लिमांची घुसखोरी या प्रमुख समस्या आहेत.
पूर्वांचल पाच आंतरराष्ट्रीय सीमांशी जोडला गेला आहे.पूर्वांचल हा भौगोलिकदृष्ट्या लांबचा प्रदेश रम्य निसर्ग, समृद्ध वन संपदा, साधे-प्रेमळ लोक आणि समाधानी व शांत लोकजीवन ही वैशिष्ट्ये या प्रदेशाची सांगता येतील. पण भौगोलिक अंतरामुळे जितके स्वाभाविक येणे-जाणे, सरमिसळ भारतातील अन्य राज्यांत होत होती, तितकी ती पूर्वांचलात होऊ शकली नाही.
कार्यक्रमाचे आभार सहकार्यवाह रवी नामदे यांनी मानले.