Pune : नुसती मंदी नाही, ती अधिकाधिक तीव्र होत चालली – डॉ. भालचंद्र मुणगेकर
तोडगा काढण्यासाठी सरकारने अर्थ तज्ञांची गोलमेज परिषद बोलवावी
एमपीसी न्यूज – देशात नुसती मंदी नसून ती अधिकाधिक तीव्र होत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने अर्थतज्ज्ञांची गोलमेज परिषद बोलवावी, अशी मागणी भारत सरकारचे नियोजन समितीचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली.
‘भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती व त्यावरील उपाय’ या विषयावर डॉ. मुणगेकर यांची काँग्रेस भवन येथे गुरुवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी काँगेस शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, स्वीकृत नगरसेवक अजित दरेकर उपस्थित होते.
डॉ. मुणगेकर म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांनी सुचविल्याप्रमाणे सरकारने 70 हजार कोटी पॅकेज दिले. जीएसटीबाबत फेरविचार करणार असल्याचे सांगितले. मात्र, याचे श्रेय विरोधी पक्षाला मिळू नये. यासाठी ही धावपळ सुरू आहे. बचत, गुंतवणूक, औद्योगिक उत्पादन, आयात, निर्यात, वित्तीय तूट हे 6 निकष प्रतिकुल परिस्थितीत आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही या सारकारचा काळात वाढवण्यात येत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसत आहे. 80 रुपये दराने पेट्रोलची किंमत आहे. त्यावर 40 रुपये टॅक्स आकारले जात आहेत.
सरकारने अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, गुंतवणूक वाढवावी, खासगी गुंतवणुकीवर अवलंबून राहू नये, महात्मा गांधी रोजगार हमी योजना भक्कम करावी, ऑटोमोबाईल क्षेत्राला जीएसटीमधून सूट द्यावी, अशा अनेक उपाययोजना मुणगेकर यांनी सुचविल्या. आरोग्य, शिक्षण यावळ केंद्र आणि राज्य शासन केवळ 4 टक्के खर्च करते. उत्पादकता वाढविण्यासाठी हा खर्च वाढवावा. सध्या सरकारतर्फे अमर्यादित खासगीकरण सुरू आहे. पक्षीय मतभेद बाजूला सारून देश रसातळाला जाऊ नये, यासाठी सरकारने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, अशा शब्दांत मुणगेकर यांनी हल्लाबोल केला. दरम्यान, महाराष्ट्र राज्य आता औद्योगिक उत्पादन राहिले नाही. छत्तीसगड, राजस्थान, बिहार, गुजरात, तामिळनाडू, ही राज्य पुढे गेल्याची त्यांनी आठवण करून दिली.