Maval : मावळच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सुनील शेळके यांनाच संधी द्या – शरद पवार

एमपीसी न्यूज – मावळच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या तसेच गरजूंच्या पाठीशी सदैव उभे राहणाऱ्या सुनील शेळके यांनाच मावळवासीय संधी देतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जाहीर सभेत व्यक्त केला. मावळचा निकाल या सभेच्या अभूतपूर्व गर्दीवरूनच स्पष्ट झाला असून त्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस-एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पवार बोलत होते. व्यासपीठावर उमेदवार सुनील शेळके, माजी मंत्री मदन बाफना, माजी खासदार नानासाहेब नवले माजी आमदार कृष्णराव भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार जयदेव गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, पै चंद्रकांत सातकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,  एसआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे , एसआरपीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठलराव शिंदे, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे, जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले, देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अॅड कृष्णा दाभोळे, लोणावळा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जीवन गायकवाड, ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाषराव जाधव, तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, सुरेश चौधरी, यादवेंद्र खळदे, चंद्रभान खळदे,सरपंच दत्तात्रय पडवळ, जिल्हा युवक उपाध्यक्ष संतोष मु-हे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, तसेच रुपालीताई दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, मावळात निवडणुकीचा निकाल काय लागणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आपण राज्यात अनेक प्रचंड सभा पाहिल्या आहेत, पण तळेगावात आज गर्दी पाहतोय, त्यावर आपला विश्वासच बसत नाहीत. ‘मंत्री महोदय, यहाँ कुछ बदलाव आ रहा है’, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीच्या सर्वच नेत्यांनी यावेळी समंजसपणाची दृष्टी दाखवली व तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सुनील शेळके या युवकाच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला. केवळ तालुक्याच्या विकासाचाच विचार करणाऱ्या या तरुणाच्या पाठीशी मावळची सर्व जनताही खंबीरपणे उभी राहील, अशी खात्री पवार यांनी व्यक्त केली. तुम्ही सुनील शेळके यांना निवडून द्या, मावळच्या विकासाला आपण काहीही कमी पडू देणार नाही.

भाजपचे सरकार हे शेतकरी, कामगार, महिला अशा सर्वच समाजघटकांवर अन्याय करीत आहे. हे सरकार घालविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. मला जनतेने आतापर्यंत सर्व काही दिले आहे. आपल्याला आता काहीही नको आहे.आपल्याला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचाय. विकासाची दृष्टी असलेल्या तरुण नेतृत्वाच्या हातात सत्ता द्यायची. त्यासाठी या वयात आपण कष्ट घेत आहोत, असे ते म्हणाले. तरुण पाठीशी असताना वय ही अडचण ठरत नाही, असेही ते म्हणाले.

 

भाजप सरकारवर पवार यांनी कडाडून टीका केली.  १६ हजार शेतकऱ्यांनी कर्जामुळे आत्महत्या केल्या. हे सरकार धनाढ्यांच्या कर्जाची थकबाकी भरण्यासाठी सरकारी तिजोरीतून ८१ हजार कोटी रुपये देते आणि शेतकऱ्यांच्या कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी  शेतकऱ्यांवर जप्ती आणते. शेतीमालाची किंमत वाढली की दिल्लीत दंगा होतो. त्यांना बाकी महागाई चालते. सत्ताधारी फक्त ग्राहकांचा विचार करतात. आम्ही नेहमी शेतकऱ्यांचा विचार करतो. आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. शेतकऱ्यांना न्याय देण्याची आमची नेहमीच भूमिका राहिली आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

 

राज्यात आम्ही उद्योग- धंदे वाढवले. औद्योगिक वसाहती उभ्या केल्या. त्यातून तरुणांना रोजगार मिळावा हा हेतू होता. पण प्रत्यक्षात त्यात उत्तर प्रदेश आणि बिहारचे कामगारच काम करताना दिसत आहेत. आपल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी राज्यात सत्तापरिवर्तन होणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला. महिलांना सन्मान दिला. या सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले. यूपीमध्ये मंत्री बलात्कार करतो, भाजप राजवटीत महिला असुरक्षित आहोत, असा आरोप पवार यांनी केला. कामगारांवर सर्वत्र अन्याय सुरू आहे. रोजगार वाढण्याऐवजी सर्वत्र कामगार कपात सुरू आहे. अशा लोकांच्या हातात सत्ता नको, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागाचा विश्वासघात केल्याचा आरोप करीत टीकास्त्र सोडणाऱ्या मावळ तालुक्यातील बाळासाहेब नेवाळे यांचा पवार यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. दूध संघाचे तीन वेळा अध्यक्ष दिले. तिथे लोण्याचा गोळा मिळाल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालकपद दिल्यानंतरही ते अन्याय झाला म्हणत असतील तर कठीण आहे. हे वागणे बरे नव्हे. तालुक्याच्या हितासाठी मन मोठे करा. नाही तर जनता निर्णय घेणारच आहे, असे पवार म्हणाले.

सुनील शेळके म्हणाले की, माझ्यावर तुम्ही सर्वांनी विश्वास दाखवला.तुम्हा सर्वांचे आभार मानतो. प्रेम करणारी माणसं पाठीशी आहेत. आता जनतेने ठरवले आहे. मला एक वेळ संधी द्या, पाच वर्ष तुमच्यासाठी कष्ट करीन. चार पिढ्या भाजपाचे काम करीत आहोत. मी पण तळमळीने भाजपचे काम करीत होतो, जनतेला न्याय देण्यासाठी एक संधी मागितली. माझं काम पवार साहेबांना समजले, काँग्रेस, राष्ट्रवादीला समजले पण  भाजपच्या नेत्यांना समजले नाही, याचे वाईट वाटले. राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता भाजपचे नेते एकमेकांना दोष देतात पण आता वेळ निघून गेली. आता त्यांना फळे भोगावी लागतील.

आम्हाला तालुक्याचा विकास करायचा आहे. लोकांना न्याय द्यायचा आहे. ही मावळच्या विकासाची, स्वाभिमानाची निवडणूक आहे. मला जनतेची आपुलकी व विश्वासाने मोठे केले,  असे शेळके म्हणाले. भाजपने उमेदवारी जाहीर केली तेव्हा फटाके वाजवत आपल्या घरासमोरून जाण्याची संस्कृती आहे का, असा सवालही त्यांनी केला. कार्यकर्त्याला आधार देण्याचे काम साहेबांनी केले. तालुक्याला न्याय द्या, जनता तुम्हाला विसरणार नाही, असे ते म्हणाले.

राज्यमंत्री सांगतात मावळात १४०० कोटी रुपये आले, ते गेले कुठे, असा सवाल शेळके यांनी केला. मिसाइल प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. भाजपने पवना जलवाहिनीचे, गोळीबार,  बलिदान, रक्तपात याचे राजकारण यापुढे करू नये. भाजपला या प्रश्नात एवढे स्वारस्य होते तर पाच वर्षात प्रकल्प रद्द का केला नाही, असा सवाल त्यांनी केला. वेळ आली की आपण सगळा खुलासा करू, असा इशाराही त्यांनी दिला.

बेबेडओहोळ, कामशेत पूल, वडगाव रेल्वे पूल प्रलंबित आहेत.लोक त्रस्त आहेत. भाजपने विकासावर बोलावे. कोट्यवधीची कामे मंजूर झाल्याचे बॅनर लावले पण प्रत्यक्ष काम केले असते तर जनता माझ्याबरोबर आली नसती, असा शेराही त्यांनी मारला. दोन लाख रुपयांची विमा पॉलिसी उतरविण्याच्या नावाखाली भाजपने माय-भगिनींची फसवणूक चालवली आहे. माय-भगिनी वर गेल्यानंतर हे दोन लाख मिळणार आहेत. असे दोन लाख रुपये नकोत आम्हाला. आमची माय-भगिनी निरोगी जगली पाहिजे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.