Osmanabad News : पांढरी स्मशानभूमीचा कायापालट; सामूहिक प्रयत्नांतून दहा वर्षांनंतर परिसर झाला लख्ख

एमपीसी न्यूज – उस्मानाबाद शहरातील सर्वात जुनी स्मशानभूमी असलेल्या पांढरी परिसराने तब्बल एका दशकानंतर मोकळा श्वास घेतला आहे. मागील अनेक वर्षांपासून दुर्गंधी आणि घाणीच्या विळख्यात पांढरी स्मशानभूमी अडकून पडली होती. परिसरातील नागरिकांनी घेतलेला सामूहिक पुढाकार आणि नगरसेवक सुरज साळुंके यांनी लावलेला हातभार यातून पांढरी स्मशानभूमीचा चक्क कायापालट झाला आहे. रंगीबेरंगी फुलझाडे, तुळशी वृंदावन आणि लख्ख रस्ते यामुळे स्मशानभूमीचे रूपांतर स्मृतीवनात झाले आहे.

उस्मानाबाद शहरातील सर्वात जुनी स्मशानभूमी म्हणून पांढरी स्मशानभूमीचा उल्लेख केला जातो. शहराचा विस्तार झाला. शहराचा विस्तार झाला. त्यामुळे एरवी दूर वाटणार्‍या कपिलधार स्मशानभूमीकडे अंत्यविधीसाठी गर्दी होऊ लागली. पांढरी स्मशानभूमी परिसरातील नागरिकांकडून झालेले दुर्लक्ष, अस्वच्छता आणि परिसराला आलेले हागणदारीचे रूप त्यामुळे जुन्या शहरातील नागरिकही अंत्यविधीसाठी पांढरीकडे फिरकेनात.

वीज, पाणी, रस्ते यांची वानवा असल्यामुळे आपसूकच स्मशानभूमी घाणीच्या विळख्यात आणि झुडपांच्या साम्राज्याने वेढली गेली. मागील दहा वर्षांपासून या स्मशानभूमीची मोठी दुरावस्था झाली होती. ही दुरावस्था परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत दूर केली आहे. काटेरी झुडपे, वाढलेले गवत, अस्ताव्यस्त पडलेले कचर्‍याचे ढीग बाजूला करण्यात आलेे आहेत. मांडी घालून बसता येईल, इतका स्वच्छ आणि लख्ख परिसर झाला आहे. ज्या ठिकाणी संरक्षक भिंत नाही, त्या ठिकाणी काटेरी कुंपण उभारण्यात आले आहे.

अंत्यविधी करण्यासाठी बांधण्यात आलेल्या शेडची दुरावस्था झाली होती. त्याचबरोबर स्मशानभूमीतील कर्मचार्‍यांकरिता उभारण्यात आलेल्या खोलीमध्ये जनावरांचा वावर वाढला होता. माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके यांनी स्वखर्चातून परिसराला रंगरंगोटी करून स्वच्छता केली आहे. अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत मुक्कामी कर्मचारी देखील उपलब्ध झाला आहे. अंत्यविधीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची देखील उपलब्धता या कर्मचार्‍यांनी या ठिकाणी केली आहे. मागील तीन महिन्यांपासून परिसराच्या साफसफाईचे काम सुरू होते. त्याला आता पूर्णत्व आले आहे.

मात्र पांढरी स्मशानभूमीची झालेली दुरावस्था सर्वदूर पोहोचल्याने मागील वर्षभरापासून अंत्यविधीसाठी तिकडे कोणीच फिरकले नाही. त्यामुळे आपली उपजीविका कशी भागणार? असा सवाल स्मशानभूमीत कुटुंबीयांसह मुक्कामी असलेले मसनजोगी गंगाधर इरवाडे यांना पडला आहे.

जुन्या शहरातील लोकांची सोय होईल
अन्य ठिकाणी अंत्यविधी करण्याकरिता टेम्पो, गाड्या, चित्ररथ, असा खर्च करावा लागतो. तो सर्वांनाच परवडेल असे नाही. त्यामुळेच नगरसेवक सुरज साळुंके यांच्या मदतीने मागील चार महिन्यांपासून आम्ही हा परिसर स्वच्छ केला आहे. अनेकांना पांढरी स्वच्छ झाल्याचे माहीत नाही. त्यांनी आवर्जून हा परिसर पहावा तसेच किमान जुन्या शहरातील आणि परिसरातील मयत नागरिकांच्या अंत्यविधीची सोय होईल, असे गंगाधर इरवाडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.