Pandharpur: कोरोनामुळं द्वादशीलाच पालख्यांनी घेतला विठुरायाचा निरोप

Due to Korona, the palkhi took leave of Vithuraya on Dwadashi यंदा कोरोना विषाणूच्या साथीमुळे पायी आषाढी वारी रद्द करण्यात आली होती.

एमपीसी न्यूज- दरवर्षी आषाढी यात्रेच्या अनुपम्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातून येथे आलेल्या मानाच्या संतांच्या पालख्या पौर्णिमेच्या दिवशी पंढरीतून आपल्या गावी जाण्यासाठी प्रस्थान करतात. परंतु, कोरोना महामारीने अवघ्या विश्वाला विळख्यात घेतलेले आहे. सर्व व्यवहार, चालीरीती नावापुरत्याच सुरु आहेत. याला आषाढी वारी ही अपवाद राहिली नाही. यंदा कोरोनामुळे या सर्व परंपरा पाळणे अशक्य झाल्याने पालख्यांनी द्वादशीलाच विठुरायाचा निरोप घेतला.

यंदा कोरोना विषाणूच्या साथीमुळे पायी आषाढी वारी रद्द करण्यात आली होती. परंपरा अबाधित राहण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत मानाच्या पालख्या पंढरीत पोहोचल्या.

कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशी अत्यंत साधेपणाने साजरी झाली. संतांच्या पालख्या विसावलेल्या मठातून एकादशीला पादुकांना चंद्रभागेत स्नान घालण्यात आले. यानंतर नगरप्रदक्षिणा झाली. रात्री हरिजागर झाला. गुरुवारी द्वादशीला संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांबरोबरच मानाच्या विविध संतांच्या पादुका विठुरायाच्या भेटीसाठी मंदिरात आल्या. संत ज्ञानेश्वर महाराज आणि विठुरायाची भेट झाली. त्यानंतर विठुरायाच्या भेटीसाठी एक-एक संतांच्या पादुका गाभाऱ्यात दाखल होत होत्या.

संतांची परंपरा अखंडित ठेवत संत-देव भेटीचा हा अवर्णनीय सोहाळा भाविकांनी सोशल मीडियावर अनुभवला. गुरूपौर्णिमेच्या दिवशी पालख्या परतीचा प्रवास करतात.

परंतु, कोरोना वैश्विक महामारीमुळे शासनाने दिलेल्या निमानुसार वेळेनुसार संत-देव भेट घेऊन पालख्यांनी द्वादशीलाच परतीचा प्रवास केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.