Pavana Dam News : पवना धरणातून रविवारी सकाळपासून तीन हजार क्युसेकने विसर्ग होणार; पवना धरण भरले 96 टक्के

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पवना धरण शनिवारी (दि. 29) सायंकाळी सहा वाजेपर्यंत 96 टक्के भरले.  रविवारी (दि. 30) सकाळी नऊ वाजल्यापासून तीन हजार क्युसेकने पवना नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर मागील दोन दिवसात पुन्हा वाढला आहे. जुलै अखेरपर्यंत दडी मारलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून चांगलीच कृपादृष्टी दाखवली आहे.

31 जुलैपर्यंत धरणात 33.60 टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पवना धरण 95 टक्के भरले आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर धरण लवकरच 100 टक्के भरणार आहे.

त्यामुळे खबरदारी म्हणून पवना नदीपात्रात रविवारी सकाळ पासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी तीन हजार क्युसेकने विसर्ग सुरु होणार आहे.

नदीचे पाणी वाढले तर नदीकाठच्या गावांना त्याचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नदीकिनारी असलेली सर्व साधन सामुग्री , वाहने व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावेत. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना देखील प्रशासनाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.