Pimpri : जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानाच्या दुस-या पर्वास प्रारंभ

एमपीसी न्यूज – पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न’ या अभियानाच्या दुस-या पर्वाची सुरुवात करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना नदीला स्वच्छ आणि जलपर्णीमुक्त करण्याचा संकल्प रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने घेतला आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व सामाजिक, पर्यावरणप्रेमी संघटनांना सोबत घेऊन हे अभियान राबविण्यात येणार आहे.

‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ अभियानाच्या दुस-या पर्वाचे उदघाटन स्वराज्य रक्षक संभाजी, तू माझा सांगाती फेम सायली राजहंस-सांभारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार नाथाजी धुमाळ यांचे वंशज बापूसाहेब धुमाळ, चंद्रकांत कुलकर्णी, सूर्यकांत मुथीयान, रमेश सरदेसाई, पर्यावरण अभ्यासिका डॉ. सायली पाटील, ब प्रभाग अध्यक्षा करूणा चिंचवडे, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे, मल्लिनाथ कलशेट्टी, बाळकृष्ण खंडागळे, स्वाती वाल्हेकर, माया वाल्हेकर, राजश्री वाल्हेकर, डॉ. मनीषा दाणाने, सिकंदर घोडके, धनंजय शेडबाळे, हेमंत गावंडे, सोमनाथ मुसुडगे आदी उपस्थित होते. तसेच ग्राहक मंच, तनपुरे फाउंडेशन, पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम, शेखर आण्णा चिंचवडे फाउंडेशन, सावरकर मित्र मंडळ, ग्रीनोव्हेशन संस्था रोटरी क्लब ऑफ चिंचवड, देहू रानजाई प्रकल्प, त्याची नदीवर प्रत्यक्ष काम करणारी टीम, डी. वाय पाटील महाविद्यालयाचे 100 विद्यार्थी, एस पी वायर्स कंपनीचे 25 कामगार आदी संस्थांनी देखील सहभाग घेतला.

शिवचरित्राचे अभ्यासक निलेश मरळ यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. त्यानंतर उपस्थित महिलांनी नदी स्वच्छतेच्या अवजारांचे पूजन केले. त्यानंतर नदी स्वच्छतेच्या श्रमदानास सुरुवात करण्यात आली. नदी व पर्यावरण अभ्यासक गुणवंत पाटील यांनी नदी स्वच्छतेत आपली वैयक्तिक जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले. सायली सांभारे यांच्या हस्ते ‘नदीची व्यथा ही नदी मांडते’ या पत्राचे अनावरण करण्यात आले. याचे वाचन सोमनाथ हरपुडे यांनी केले.

सायली सांभारे म्हणाल्या, “नदी ही आपल्या आईसारखी आहे. नदी ज्याप्रमाणे कोणताही भेदभाव न करता सर्वांना आपल्यात सामावून घेते, त्याप्रमाणे आपण देखील तिची सेवा करायला हवी. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने सुरु केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून यामुळे भविष्यात पाण्याची गरज भागणार आहे. या उपक्रमात मी आणि माझे सहकारी कलाकार प्रत्यक्ष सहभाग घेणार आहोत. तसेच उपक्रमासाठी आर्थिक मदत उभारण्यासाठी आम्हा कलाकारांच्या वतीने एक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार आहे.”

प्रदीप वाल्हेकर म्हणाले, “मागील वर्षी गणेश विसर्जनानंतर पवना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी आली होती. ती सर्व जलपर्णी पहिल्या पर्वात काढून टाकली. त्यामुळे अद्याप नदीमध्ये जलपर्णीची मागील वर्षी एवढी विदारक परिस्थिती नाही. त्यामुळे सुरुवातीला नदीवरील घाट, बंधारे स्वच्छ करण्याचे काम करण्यात येणार आहे. येत्या रविवारी (दि. 14) केजुबाई बंधारा येथे हा उपक्रम होणार आहे. लोकांनी निसर्गाशी एकरूप व्हावे यासाठी शिवचरित्राचे अभ्यासक निलेश मरळे यांचे ‘शिवाजी महाराज आणि त्यांचे निसर्गाप्रती धोरण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. शहरातील जास्तीत जास्त निसर्गप्रेमींनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.”

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाचे पहिले पर्व तब्बल 215 दिवस चालले. या अभियानामध्ये एकूण 1455 ट्रक जलपर्णी पवना नदीतून बाहेर काढण्यात आली.जून महिन्यात पावसाळा सुरु होत असल्याने जून महिन्यात या अभियानाला थांबविण्यात आले होते. आता पावसाळा संपला असल्याने या अभियानाला पुन्हा सुरु करण्यात आले आहे. प्रस्तावना रो. सुधीर मरळ, सूत्रसंचालन अॅड. सोमनाथ हरपुडे यांनी केले. तर आभार रो. वीरेंद्र केळकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.