Pimple Gurav: मराठवाड्यातील लोकांचे स्थलांतरीत होणे चिंताजनक – संभाजी पाटील-निलंगेकर

एमपीसी न्यूज – मुंबई, पुणे परिसरात औद्योगिक वसाहती निर्माण होत असताना तत्कालीन राज्यकर्त्यांनी मराठवाड्याचा विचार केला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील तरुणांवर कामासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ आली. मराठवाड्यातील लोकांचे स्थलांतरित होणे ही बाब चिंताजनक असल्याचे, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. तसेच सरकार मराठवाड्याला औद्योगिक गती देण्यासाठी प्रयत्नशील असून त्यानंतर मराठवाड्यातील तरुणांना स्थलांतरीत होण्याची गरज भासणार नाही, असेही ते म्हणाले.

मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’ वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, लातूरचे माजी आमदार शिवाजीराव कवेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागन्नाथ कोतापल्ले, सभागृह नेते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, कार्यक्रमाचे संयोजक व ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर, ह.भ.प. वाघ महाराज, ह.भ.प. तुकाराम महाराज, ह.भ.प. शिवानंद महाराज, शिवव्याख्याते डॉ. गजानन वाव्हळ महाराज, वामन भरगंडे, सूर्यकांत कुरुलकर, माधव मनोरे, दत्तात्रय धोंडगे, शंकर तांबे, नामदेव पवार, नगरसेवक, कार्यकर्ते, मराठवाड्यातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन झालेच नसते, तर मध्य भारताच्या पोटात एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले असते. हा भारताच्या दृष्टीने मोठा धोका होता. त्यामुळे मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन होणे, ही गोष्ट ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची तर आहेच; शिवाय भारतीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त करून देणारी आहे असे सांगत, डॉ. नागन्नाथ कोतापल्ले म्हणाले की दुर्दैवाने भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात मराठवाडा संग्रमाची नोंद फारशी घेतली जात नाही.

“भारत स्वतंत्र झाला, तेव्हा भारतात सहाशे ते सव्वासहाशे संस्थानिक होते. त्यानंतर जवळजवळ सर्वच संस्थानिक स्वतंत्र भारतात विलीन झाले. पण निजामाचा स्वतंत्र भारतात विलीन होण्याला नकार होता. मराठवाडा हा 16 जिल्ह्यांचा मोठा प्रदेश होता. जर मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन झालाच नसता, तर मध्य भारताच्या पोटात पुन्हा एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले असते. हा एक भारतासाठी मोठा धोका होता. म्हणून मराठवाड्यातील लोकांनी लढे उभारले, संघर्ष केला, बलिदान दिले. त्यामुळे मराठवाडा भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक वर्ष एक महिन्याने स्वतंत्र झाला. आणि भारताच्या स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त झाला” असे डॉ. कोत्तापल्ले म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संपत गर्जे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.