Pimpri : ‘आपले सरकार’ केंद्र कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे आर्थिक मदतीची मागणी
एमपीसी न्यूज – कोरोनामुळे महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाली. त्यामुळे आपले सेवा केंद्र बंद आहे. अशा बिकट परिस्थितीत सेंटरचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल, इंटरनेट बिल, व कुटुंबाचे पालन पोषण करणे अवघड झालेले आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी महा-ई-सेवा केंद्र व्हीएलई युनियन अध्यक्ष राजेश गायकवाड यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्यात एकूण पंचवीस हजार आपले सेवा केंद्र व चार हजार पाचशे आधार सेंटर धारक मागील 10 वर्षापासून सरकारच्या माध्यमातून सामान्य लोकांना सरकारी सुविधा पुरवित आहे. राज्यातील दुर्गम भागापर्यंत, गाव पातळीवर उद्योजक म्हणून शासनाच्या आदेशाने वेळेची पर्वा न करता सामान्य जनतेला ऑनलाईन सेवा देत आहे.
परंतु, मागील चार वर्षापासून महाऑनलाईन कंपनीने आम्हाला कोणत्याही प्रकारचे आधारचे पेमेंट केले नाही तसेच कंपनी आम्हाला ‘आपले सरकार’ चे महिन्याला येणारे कमिशनसुद्धा देत नाही. त्यामुळे शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी आणि महाऑनलाईन कंपनीकडे आधार केंद्र चालकाचे थकलेले पेमेंट त्वरित देण्यात यावे, अशी मागणी महा-ई-सेवा केंद्र व्हीएलई युनियन अध्यक्ष राजेश गायकवाड यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाली त्यामुळे सेंटर बंद आहे. अशा बिकट परिस्थितीत सेंटरचे भाडे, कर्मचार्यांचे पगार, वीजबिल, इंटरनेट बिल, व स्वता:च्या घराचे पालन पोषण करणे अवघड झालेले आहे. तेव्हा शासनाने आम्हाला त्वरित आर्थिक मदत करावी. अशी मागणी गायकवाड यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.