Pimpri : भोसरी, गव्हाणेवस्तीतील नाल्यांचे नुतनीकरण होणार; सांडपाण्यावरही प्रक्रिया करणार
नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे यांची माहिती; पंपिंग स्टेशनची क्षमता वाढविणार; सल्लागाराची नेमणूकही करणार
एमपीसी न्यूज – भोसरीतील नाल्यांचे नुतनीकरण केले जाणार आहेत. पंपिंग स्टेशनची क्षमता वाढविण्यात येणार आहे. मैलाशुद्धीकरण केंद्र आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. त्याचा सर्व्हे करुन सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि निविदा काढण्याकरिता मेसर्स ब्ल्युस्ट्रीम इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सलटंट प्रा. लि या सल्लागाराची आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत नियुक्ती करण्यात आली. यामुळे महापालिका हद्दीतील जलप्रदूषण रोखले जाईल. सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केले जाणार आहे. याबाबतची माहिती नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे आणि नम्रता लोंढे यांनी दिली.
भोसरीपासून सुरु होणा-या नाल्याचे पाणी थेट इंद्रायणीनगरमार्गे गव्हाणेवस्तीतून छोट्या नाल्यातून सीएमईकडे जाते. हा नाला अतिशय छोटा असल्याने पावसाळ्यात नाला ओसांडून वाहतो. त्यामुळे भोसरीतील प्रभाग क्रमांक सातमधील दाट लोकवस्ती असलेल्या भागात पावसाच्या पाण्यामुळे हा नाला ‘ओव्हरफ्लो’ होतो. काही ठिकाणी या नाल्याला ड्रेनेजच्या लाईन जोडल्या आहेत. त्यामुळे ड्रेनेज मिश्रित पाणी नाल्याच्या बाजूला असलेल्या घरात जात होते. त्याचा नागरिकांना त्रास होत होता.
- त्याचबरोबर आदिनाथनगर येथील डीएस 1 आणि लांडेवाडीतील बीएस दोन हे नाले याच मुख्य नाल्याच्या बाजूला आहेत. त्यामुळे हा मुख्य नाला आणि त्याला जोडणारे इतर नाले व ड्रेनेज लाईन अद्यावत पद्धतीने सुधारित केले जाणार आहेत. याशिवाय भोसरीतील प्रभाग क्रमांक 5, 6, 7 मध्ये सर्वे क्रमांक 231 दिघीरोड, सर्वे 217, गव्हाणे पेट्रोल पंपजवळ डीएस एक, आदिनाथनगर बीएस दोन लांडेवाडी ही पंपिंग स्टेशन आहेत. याची क्षमता कमी असल्याने हे अद्यावत केले जाणार आहे. त्याची क्षमता वाढविली जाणार आहे. नुतनीकरण केले जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्याचा सर्व्हे करून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि निविदा काढण्याकरिता मेसर्स ब्ल्युस्ट्रीम इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सलटंट प्रा.लि यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे म्हणाले, ”गव्हाणेवस्ती, सद्गुरुनगर येथील अनेक नागरिकांच्या घरात पावसाळ्यात पाणी जात होते. नाल्याला ड्रेनेजच्या लाईन जोडल्याने ड्रेनेज मिश्रित पाणी नागरिकांच्या घरात जात होते. गुडघाभर पाणी घरात साचत होते. दरवर्षी पावसाळ्यात हा प्रश्न उद्भवत होता. मागील अकरा वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पाणी पुढे पाठविल्यानंतर सीईएमीवाल्यांना देखील कोणतीही अडचण येणार नाही. जलप्रदूषण होणार नाही. नाल्याचे नुतनीकरण केल्यावर सांडपाणी नागरिकांच्या घरात जाणार नाही”
स्थायी समिती सदस्या नम्रता लोंढे म्हणाले, ”नाला ओव्हरफ्लो होत असल्याने नागरिकांच्या घरात गुडघ्यापर्यंत पाणी जात होते. त्यामुळे नाल्याचे नुतनीकरण करणे आवश्यक होते. नाल्याचे नुतनीकरण करणे, त्याची क्षमता वाढविणे आवश्यक होते. सांडपाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे होते. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी सल्लागार नेमणे गरजेचे होते. त्यानुसार स्थायी समितीमध्ये सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे”.