Pimpri: भाजप-शिवसेना युतीचा जागा वाटप अन्‌ सत्तेतील भागीदारीचा ‘फिफ्टी-फिफ्टी’ फॉर्म्युला निश्चित – चंद्रकांत पाटील

लोकसभेच्या विजयाने हुरळून जाऊ नका, गाफील राहू नका

एमपीसी न्यूज – भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. विधानसभा निवडणुकीत 50 टक्के जागा आणि 50 टक्के सत्तेतील भागीदारी हे या फॉर्म्युल्याचा मूळ गाभा आहे. जागा वाटपाच्या चर्चेला बसल्यावर जागा आदला-बदलीचा योग्य तो तोडगा काढला जाईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (मंगळवारी) सांगितले. तसेच युतीत आम्ही वर्षानुवर्षे लढलो. काही ठिकाणी बंड करायचे पण आता कार्यकर्त्यांमध्ये समजूतदारी वाढली आहे. रात्रीनंतर पुन्हा पहाट होते, असेही ते म्हणाले. लोकसभेच्या विजयाने हुरळून जाऊ नका, गाफील राहू नका अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

पिंपरीतील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची रणनीती ठरली आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला आहे. चर्चेत जागांची आदलाबदल होऊ शकतो.

  • लोकसभा आणि विधानसभा निवडणूक वेगवेगळी असते. लोकसभा निवडणुकीत नागरिक वेगळा विचार करतात. विधानसभेला वेगळा विचार करतात. ओडिसामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित झाली.

लोकसभेला भाजपचे 8 खासदार निवडून आले. तर, केवळ 20 आमदार निवडून आले आहेत. दोन्ही निवडणुका एकत्रित होऊन देखील नागरिकांनी एकत्रित विचार केला. हे उदाहरण सांगत लोकसभेच्या विजयाने हुरळून जाऊ नका. गाफील राहू नका, अशा सूचनाही पाटील यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

  • विधानसभेची निवडणूक राज्यात 15 ते 20 ऑक्‍टोबर दरम्यान होईल. त्यादृष्टीने आत्तापासून कामाला लागा. केंद्र, राज्य सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवा. संजय गांधी योजनेचा लाभ नागरिकांना मिळवून द्या, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.