Pimpri : लोकांच्या मनात गुणवत्तेची जाणीव होण्यासाठी ‘बी. एस. के. गुणवत्ता जाणीव जागृती संस्था’ सदैव कार्यतत्पर

एमपीसी न्यूज – माणसाच्या आयुष्यात गुणवत्तेचा फार मोठा वाटा आहे. गुणवत्ता असण्याकरिता आणि आपल्या कोणत्याही कृतीमध्ये गुणवत्ता आणण्यासाठी मनात त्याची जाणीव निर्माण होणे आवश्यक असते. आपले कोणतेही काम गुणवत्तापूर्ण हवे ही जाणीवच माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकते. वस्तू किंवा सेवेच्या बाबतीत देखील हेच तत्व गरजेचे असते. आपण देत असलेली सेवा किंवा वस्तू गुणवत्तेने परिपूर्ण असली पाहिजे ही भावना आपल्या मनात असेल तरच आपण प्रगती करु शकतो. हीच बाब सर्वसामान्य लोकांच्या मनात बिंबवणे गरजेचे असते. हे तत्व हेच आपले ध्येय मानून मागील सुमारे तीस वर्षांपासून प्रोफेसर रमेश कासेटवार (निवृत्त कर्नल) हे काम करीत आहेत. “बी एस के गुणवत्ता जाणीव जागृति संस्था” या संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात गुणवत्तेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत.

वडगाव मावळजवळील जांभूळ या गावाजवळील व्हिजन सिटी येथे प्रा. रमेश कासेटवार यांनी ‘बी एस के गुणवत्ता जाणीव जागृति संस्था’ या संस्थेची स्थापना केली असून त्याच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांना गुणवत्तेशी संबंधित शिक्षण देणे हे त्यांनी उद्दीष्ट ठेवले आहे. शिक्षण क्षेत्र, विविध प्रकारच्या सामाजिक घटना किंवा संघटना, औद्योगिक क्षेत्राशी संबंधित कोणतेही काम असेल तरी या सर्वांना गुणवत्तेशी संबंधित सर्व प्रक्रियेंवर प्रशिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना केली असून त्याचा फायदा समाजातील सर्वच स्तरातील लोकांना होणार आहे.

आपल्या ‘बी एस के गुणवत्ता जाणीव जागृति संस्थे’विषयी बोलताना प्रा. रमेश कासेटवार(निवृत्त कर्नल) म्हणाले की, जोपर्यंत लोकांच्या मनात गुणवत्तेविषयी जागृती निर्माण होत नाही तो पर्यंत त्यांच्या आयुष्यात गुणवत्ता येऊच शकत नाही. त्यामुळे गुणवत्तेविषयी लोकांच्या मनात जाणीव निर्माण करणे हे मी माझे ध्येय ठेवले असून त्यादृष्टीने मी पुढील वाटचाल करीत आहे.

‘बी एस के गुणवत्ता जाणीव जागृति संस्था’ ही जगामधील अशा प्रकारचे शिक्षण देणारी एकमेव संस्था आहे असा माझा दावा असून याबद्दल येथील रहिवाश्यांना अभिमान वाटला पाहिजे. अशा प्रकारचे काम करणारी संस्था या जांभूळ परिसरात आहे हे येथील वातावरणाला पोषक ठरणार आहे. सहा फेब्रुवारी रोजी या संस्थेची सुरुवात होत असून भविष्यकाळात मोठा पल्ला गाठायचा असून त्यासाठी सर्वांच्या शुभेच्छा अपेक्षित आहेत.

प्रोफेसर रमेश कासेटवार (निवृत्त कर्नल) हे दोन विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. ते मागच्या जवळपास ३० वर्षापासून गुणवत्तेशी निगडीत आहेत. त्यांनी आजपर्यंत भारतातील जवळपास ४०००० पेक्षा जास्त लोकाशी या बाबत संवाद घडवला आहे. त्यांचा हा निष्कर्ष आहे की जो पर्यंत गुणवत्तेबद्दल जाणीव जागृती होत नाही तो पर्यंत आपल्या जीवनात गुणवत्ता येऊच शकत नाही. त्यांनी आजपर्यंत “Quality Plus” या संस्थेच्या माध्यमातून गुणवत्तेशी निगडीत बरेच कार्यक्रम केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.