PCMC Unlock: कडक लॉकडाऊन संपला; बाजारपेठेत नागरिकांची पुन्हा गर्दी
Pimpri-Chinchwad: first day after lockdown in pcmc, huge crowed on road भाजी मंडई, बाजारपेठेत ग्राहक खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. विविध दुकानासमोर खरेदीसाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र आहे.
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठवड्यात सोमवारी (दि.13) मध्यरात्रीपासून दहा दिवसांचे कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्याचा कालावधी गुरुवारी (दि.23) संपला. आजपासून शहरात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असून अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारी सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खुली राहणार आहेत.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी 13 जुलैच्या पूर्वी शासनाने व महापालिकांनी लागू केलेल्या नियमांचे पालन नागरिकांना करावे लागेल, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष अधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
त्यानुसार अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारी सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंतच खुली राहणार आहेत.
तसेच, औद्योगिक आस्थापना 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील. खासगी कार्यालये, माहिती तंत्रज्ञान विषयक 50 टक्के मनुष्यबळासह सुरु, शक्य असेल तोपर्यंत वर्क फ्रॉम होम सुरु ठेवावेत.
सरकारच्या आदेशानुसार केशकर्तनालये, ब्युटी पार्लर सुरु राहणार आहेत. क्रीडा संकुले, स्टेडियम, पालिकेची मैदाने, उद्याने व्यायामासाठी सकाळी 5 ते सायंकाळी 7 पर्यंत खुली राहणार आहेत. पीएमपीएमएल बस सेवा सूरू राहणार आहे.
दरम्यान, आजपासून शहरात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असून. सकाळपासूनच रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.
भाजी मंडई, बाजारपेठेत ग्राहक खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. विविध दुकानासमोर खरेदीसाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र आहे. सलून, ब्युटी पार्लर सुरू झाल्यामुळे दहा दिवसांपासून घरात अडकून पडलेल्या नागरिक सलून बाहेर गर्दी करताना दिसत आहेत.
पीएमपीएमलची सेवा सुरु झाली असून प्रवासी पुन्हा बसस्थानकावर जमा व्हायला लागले आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सर्व ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी चिंता वाढवणारी आहे.
सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे संसर्गाचा धोका अधिक पटीने वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूट मिळताच नागरिक बेफिकीर होऊन बाहेर पडताना दिसत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा हेतूने स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांचे कडक लॉकडाउन लागू करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहरात पहिले 5 दिवस स्थानिक प्रशासनाने ठरवल्याप्रमाणे अत्यंत कडक पद्धतीने लॉकडाऊन लागू केले. पोलीस बंदोबस्त अत्यंत चोख करण्यात आला. संचारबंदी लागू करण्यात आली. रस्ते, चौक, परिसर हे ओस पडले होते.
स्थानिक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, सहाव्या दिवशी नियम शिथिल केले आणि रस्त्यांवर नागरिकांची गर्दी वाढली. पहिल्या पाच दिवसांमध्ये नागरिक घराबाहेर पडले नाहीत. परंतु, सहाव्या दिवशी अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
लॉकडाऊन असतानाही शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये तब्बल 6 हजार 472 रुग्णांची वाढ झाली आहे. या दहा दिवसातील ही आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे.
लॉकडाऊनमध्ये कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी घट्ट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दहा दिवसांच्या ‘मिनी लॉकडाऊन’मुळे महानगरपालिका प्रशासनाने नक्की काय साध्य केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.