Pimpri Chinchwad Police Recruitment : मागील भरतीत कॉपी प्रकरणात 50 उमेदवार झाले होते बाद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाच्या सन 2019 च्या (Pimpri Chinchwad Police Recruitment) भरतीत कॉपी प्रकरणात दोषी आढळल्याने तब्बल 50 उमेदवारांची झालेली निवड रद्द झाली होती. कॉपी करून पोलीस बनू पाहणाऱ्या 50 जणांना कायदेशीर प्रक्रियेला देखील सामोरे जावे लागले. मागील वेळचा अनुभव लक्षात घेता यावर्षीच्या लेखी परीक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अधिकची तयारी केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापनेवेळी आयुक्तालयास तोकडे मनुष्यबळ मिळाले. उर्वरित मनुष्यबळ तीन टप्प्यातील पोलीस भरतीमधून उपलब्ध होणार असल्याचे आदेशात सांगण्यात आले होते. सन 2019 मध्ये पोलीस भरतीचा 720 पदांचा पहिला टप्पा पार पडला. मात्र लेखी परीक्षेत हिंजवडी येथे एका बहाद्दराने स्मार्टपणे कॉपी केल्याचे आढळून आले. मास्कमध्ये बॅटरी, सिमकार्ड, इअरफोन आणि अन्य साहित्य फिट करून उमेदवार परीक्षा केंद्रावर जात असताना तपासणीत पकडला गेला.

त्याच्याबरोबर त्याच्या साथीदारांना देखील पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्यात देखील पोलीस भरतीत गैरव्यवहार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Lonavala : लोणावळ्याजवळील कुणेनामा ग्रामपंचायतीच्या सदस्याला मारहाण

कॉपी प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी औरंगाबाद, जालना आणि बीड यासह राज्याच्या विविध भागातून सुमारे 80 जणांना अटक केली. त्यात पोलिसांनी 76 मोबाईल फोन, 66 इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, 22 वॉकीटॉकी संच, 11 वॉकीटॉकी चार्जर, 11 लाख रुपये रोख रक्कम असे भलेमोठे घबाड जप्त केले. अटक केलेल्या आरोपींमधील 12 आरोपी भरती प्रक्रियेत एवढा घोटाळा करूनही नापास झाले होते.

एकंदरीत सन 2019 च्या (Pimpri Chinchwad Police Recruitment) पोलीस भरतीत 50 उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आली. ती 50 पदे यावर्षीच्या भरतीत समाविष्ट करून 216 पदांची भरती केली जात आहे. 30 जानेवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीत मैदानी चाचणी झाली. तर रविवारी (दि. 2) लेखी परीक्षा होत आहे. लेखी परीक्षेचा मागील अनुभव लक्षात घेता ताकही फुंकून पिण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना व आमिषाला बळी पडू नये. लेखी परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना कोणी आढळून आले, तर त्याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. अंतिम निकाल लागल्यानंतर उमेदवारांना लेखी परिक्षेस प्राप्त गुणांसंदर्भात काही शंका / तक्रार असल्यास त्या संदर्भात निकालानंतर 24 तासाच्या आत उमेदवारांनी लेखी निवेदन सादर करावे. – डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त

परीक्षा केंद्रात एकदा प्रवेश केल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत उमेदवारांना बाहेर जाता येणार नाही. परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, डिजीटल वॉच, डिजीटल डायरी, मायक्रोफोन, कॅलक्युलेटर, नोटपॅड, नोटस् पुस्तके, ईअरफोन, hearing aide device, इतर कुठलेही असे साहित्य ज्याचा कॉपी करण्यासाठी उपयोग होईल अथवा उपयोग होऊ शकतो असे साहित्य आण्ण्यास सक्त मनाई आहे. यावर्षी उमेदवार कॉपी करताना आढळून आल्यास त्याच्या विरोधात कायदेशिर कारवाई करण्यात येईल. तसेच त्या उमेदवाराला भरती प्रक्रियेतून बाद ठरवून त्याची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी लेखी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण कक्ष (020-27352500/020-27352600) देखील सतर्क केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.