Pimpri: ‘जमावबंदी’तही नागरिकांचा रस्त्यावर वावर; घोळके करून तरुण रस्त्यावर
एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली असताना देखील पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात नागरिकांचा वावर दिसून येत आहे. चौका-चौकात तरुण घोळके करून थांबलेले पहायला मिळतात. डांगे चौक, निगडी, दापोडी परिसरात शेअर रिक्षा धावतच आहेत. काही पानटपरीचालक चालक चोरून तंबाखू, सिगारेटची विक्री करत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाला अटकाव करण्याचे सरकारचे प्रयत्न अपुरे पडत आहेत की त्याला समाजभान नसलेल्या नागरिकांकडूनच व्यत्यय आणला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनोचा प्रादुर्भाव वाढत आहे. तब्बल 12 ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण आहे. प्रशासन त्यादृष्टीने कडक पाऊले उचलत आहे. परंतु, नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. नागरिकांची गर्दी कमी होताना दिसून येत नाही.
शहरात नागरिकांची गर्दी राहिली. तर, कोरोना विषाणूला रोखणे हाताबाहेर जाईल, अशी भिती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. महापालिकेने गर्दी नियंत्रणासाठी आळीपाळीने कर्मचा-यांना कामावार बोलविले आहे. केवळ पाच टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाज केले जात आहे. विविध उपाययोजना केल्या जात आहेत. विविध शासकीय कार्यालये बंद आहेत.
राज्यभरात जमावबंदी लागू केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी संचारबंदी देखील लागू केली आहे. बाजारपेठा बंद आहेत. परंतु, शहराच्या काही भागात नागरिकांचा वावर दिसून येत आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी, वाकड, निगडी या भागात नागरिकांचा वावर दिसून येत आहे. चौका चौकात तरुण मोबाईल फोन हातात घेऊन घोळके करून थांबलेले पहायला मिळतात.
सार्वजनिक बस, पीएमपीएमल बससेवा बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच ठराविक काळाने बस सोडल्या जात आहेत. त्याचा फायदा रिक्षा चालक उचलत आहेत. पीएमपीला लागू केलेला नियम रिक्षा चालकाला काही नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.